कणकवली : 'हिंदूत्व' विकून मुख्यमंत्रीपद मिळवण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्याचा घणाघात भाजप खासदार नारायण राणे यांनी महाविकासआघाडीवर केला. या सरकारचे मी 'स्थगिती सरकार', असे नाव ठेवले आहे. ठाकरे सरकार हे विकास करण्यासाठी अस्तित्वात आले नसून केवळ कामांना स्थगिती देण्यास आले असल्याचेही ते म्हणाले. "कोकणातील विकासकामे नव्या सत्तास्थापनेनंतर थांबली आहेत.", असा आरोपही त्यांनी केला. कणकवलीतील आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला केला.
हे पाहुणे सरकार आहे : राणे
"केवळ सत्तेसाठी एकत्र आलेल्या तीन पक्षांचे सरकार फार काळ टीकणार नाही. त्यामुळे मंत्रीमंडळ ठरण्यासाठी अडचणी येत आहेत. हे काही महिन्यांचे पाहूणे असतील. कोकणातील कांमांना स्थगिती दिल्याबद्दल जाब विचारला जाणार आहे.", असेही ते म्हणाले. येत्या १५ ते १८ डिसेंबर दरम्यान नारायण राणे हे सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्या दरम्यान अनेक प्रकरणाचा आढावा घेणार आहेत.