नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत झाशी रोडवर रविवारी सकाळी एका धान्य मंडईत भीषण आग लागली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी एकूण ३० गाड्या पोहोचल्या, अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, दुर्घटनेत तब्बल ४३ जण मृत्युमुखी पडले. तसेच १५ जणांची प्रकृती गंभीर आहे.
आगीचे मुख्य कारण हे शॉर्टसर्कीट असल्याचे सांगितले जात आहे. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदींसह अनेकांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. दिल्लीतील भाजप अध्यक्ष मनोज तिवारी, केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पूरी, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर आदी नेत्यांनी घटनास्थळी जात परिस्थितीचा आढावा घेतला. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.
रविवारी पहाटे ५ वाजून २२ मिनिटांनी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. त्यानंतर हळूहळू आग वाढत गेली. एकूण दीडशे अधिकाऱ्यांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर ६३ जणांना वाचवण्यात यश आले आहे. १५ जणांची प्रकृती गंभीर आहे. या चारमजली इमारतीवर एकूण १५० कामगार होते. त्यापैकी ४३ जणांवर झोपेत असतानाच काळाने झडप घातली.
अनेकांचा मृत्यू आगीत होरपळून झाल्याची माहिती बचावपथकाने दिली आहे. इमारतीतील निमुळत्या रस्त्यांमुळे मदत वेळीच पोहोचू शकली नाही. गोदामात असलेल्या प्लास्टीकमुळे आगीने भडका घेतला. दरम्यान, वीज वितरण कंपनीने इमारतीतील वीज मीटर सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आग लागली कि, लावली याबद्दल शंका घेतली जात आहे. दिल्ली पोलीसांनी कारखान्याच्या मालकावर गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. Delhi fire accident