
मुंबई: शुक्रवारी रात्री एका भरधाव कारने धडक दिल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याने चुनाभट्टी परिसरात जनक्षोभ उसळला आहे. कारमध्ये असलेले चारही तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे. मद्यधुंद अवस्थेत असल्याने कारवरील ताबा सुटल्याने त्यांनी रस्त्यालगत चालणाऱ्या तरूणीला धडक दिली. याच तिचा मृत्यू झाला. अर्चना नथू पारठे असे मृत तरुणीचे नाव असून, जो पर्यंत दोषींवर तत्काळ कारवाई होत नाही, तो पर्यंत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मृत मुलीच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांपैकी ३ आरोपींना अटक केली आहे.
चुनाभट्टी परिसरात काल रात्री पावणे नऊ ते सव्वा नऊच्या सुमाराला हा अपघात झाला. काल रात्री दोन मैत्रिणींच्या समवेत बाहेर निघाली असता, काही कळण्याच्या आत मागून भरधाव वेगात कार आली आणि अर्चनाला धडक तशीच पुढे निघून गेली. यात अर्चनाचा हिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सोबतच्या दोन मुलींना मोठा धक्का बसला आहे.
या गाडीत ४ मद्यधुंद तरुण बसले होते, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. शिवाय त्यांच्या कारमध्ये मद्याच्या बाटल्याही होत्या. हे ड्रंक अॅण्ड ड्राइव्हचे प्रकरण असून त्या चार तरुणांना कठोरातील कठोर शिक्षा मिळायला हवी अशी मागणी चुनाभट्टीतील नागरिक करत आहेत. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. जो पर्यंत त्यांना शिक्षा होत नाही, तो पर्यंत आम्ही आमच्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.