मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षेत तीन विषय गेले तरी आता विद्यार्थ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. तीन विषयात नापास झाल्यानंतर गुणपत्रकेवर यापुढे नापास म्हणजेच अनुत्तीर्ण ऐवजी " कौशल्य विकासास पात्र" असा शेरा दिला जाणार आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या गुणपत्रिकेवर नापास हा शेरा हटवून त्याऐवजी कौशल्य विकासास पात्र असा शेरा यापुढे देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाने जारी केला आहे.
दहावी, बारावी परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावं, यासाठी अशा विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा निर्णय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाने घेतला आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करण्यासाठी कौशल्य सेतू कार्यक्रम योजना राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.