नवी दिल्ली :“निवडणुकीत युती असलेल्या पक्षाला सोडून दुसर्या पक्षाशी आघाडी करून सत्ता स्थापन करणे हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. मात्र, शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी हेच पाऊल उचलले असून महाराष्ट्रातील शिवसेना, कॉग्रेस, आणि राष्ट्रवादी या तीन पक्षाचे मिळून बनलेले महाविकास आघाडीचे सरकार जास्त दिवस चालणार नाही. हे सरकार लवकरच कोसळेल. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेला काँग्रेससोबत जाण्याची मोठी किंमत चुकवावी लागेल,” असा सज्जड इशारा केंद्रीय दळणवळणमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिला.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. ते म्हणाले, “निवडणुकीत एका पक्षाशी युती करायची आणि निवडणुकीनंतर इतर पक्षाशी आघाडी करायची हे संविधानिकरित्या योग्य नाही. लोकशाहीसाठीही हे बरोबर नाही. शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेकडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात मते मागितली होती. त्यामुळे जनतेने भाजप-शिवसेनेला कौल दिला. पण नंतर केवळ मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने भाजपची साथ सोडली. हे लोकांनाही आवडलेले नाही,” असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
‘ही आघाडी दीर्घकाळ टिकणार नाही’
“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले हिंदुत्व आमच्यासाठी सर्वोच्च आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी या हिंदुत्वाला मानत नाही. शिवसेनेच्या याच लोकांसोबतच्या आघाडीला काही नैतिकता नाही. त्यामुळे ही आघाडी दीर्घकाळ टिकणार नाही. ही संधीसाधूंची आघाडी असून महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक झाली आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.