बंगळुरू : देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) विरोध होत आहे. दरम्यान, सोमवारी भाजपचे सरचिटणीस राम माधव म्हणाले की, “सीएएविरोधात देशव्यापी हिंसाचारात निष्पाप लोकांचा बळी गेला. विरोधी पक्षाच्या नेतृत्वात देशभरात बऱ्याच ठिकाणी हिंसक निदर्शने झाली. ज्यात अनेक निर्दोष लोकांनी प्राण गमावले. भाजपा मुस्लिमांना नागरिकत्व देण्याच्या विरोधात नाही. तसे झाले असते तर पाकिस्तानातील गायक अदनान सामी यांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले नसते."
पुढे माधव म्हणाले, "हा कायदा देशातील कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेणार नाही तर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील धार्मिक कारणावरून छळ सहन करणाऱ्यांना नागरिकत्व देते. सीएएला विरोध करणाऱ्या नेत्यांना याची पूर्ण माहिती नाही. याशिवाय त्यांना कोणत्याही नवीन गोष्टी स्वीकारायच्या नाहीत. त्याचप्रमाणे, विरोधी पक्षनेते सीएएबद्दल पूर्वग्रह ठेवण्यास प्रवृत्त आहेत.''
दुसरीकडे केरळचे मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांनी मंगळवारी सीएए रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्य विधानसभेत ठराव केला. हा प्रस्ताव मांडताना विजयन म्हणाले की, सीएए कायद्याद्वारे नागरिकत्व देताना धर्माच्या आधारे भेदभाव केला जाईल. हा कायदा घटनेतील मूलभूत मूल्ये आणि तत्त्वांचा विरोध करतो."