नवी दिल्ली : काँग्रेसच्या प्रचंड गदारोळात एसपीजी सुरक्षा विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर करण्यात आले. यावेळी काँग्रेसने सभात्याग करत विधेयकाबाबतची तीव्र नाराजी व्यक्त केली. हे विधेयक मंजूर झाल्याने आता केवळ विद्यमान पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांनाच एसपीजी सुरक्षा मिळणार आहे. माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांना ही सुरक्षा मिळणार नाही. विशेष म्हणजे हे विधेयक मंजूर झाल्याने गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षाही आपोआप मागे घेतली जाणार आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह पुढे म्हणाले, "लोकशाहीमध्ये कायदा सर्वांसाठी समान असतो, एका कुटूंबासाठी स्वतंत्र कायदा नसतो. आम्ही कुटुंबाला विरोध करीत नाही. आमचा घराणेशाहीला विरोध आहे. केवळ गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा काढली गेली नव्हती. चंद्रशेखरजी, व्ही.पी. सिंह जी, नरसिंहराव जी, आय. के. गुजराल जी आणि मनमोहनसिंग जी यांची सुरक्षाही झेड प्लसमध्ये बदलली गेली आहे. परंतु कॉंग्रेसने कोणतीही नाराजी दाखविली नाही. मग गांधी कुटुंबीयांची नाराजी का?.
"देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, गृहराज्यमंत्री आणि संरक्षणमंत्री यांना या तिघांना संरक्षण देण्यात आले आहे. त्याला देशातील सर्वोच्च सुरक्षा पुरविण्यात आली आहे. परंतु एसपीजी संरक्षण प्रदान केले जावे,असे म्हणणे योग्य नाही."हेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.