नवी दिल्ली : राष्ट्रीय नागरिक नोंदणी(एनपीआर)बाबत 'रंगा-बिल्ला आणि कुंग-फू' असे वक्तव्य केल्याबद्दल लेखक अरुंधती रॉय यांच्याविरोधात दिल्लीतील टिळक मार्ग पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. बुधवारी अरुंधती रॉय यांनी दिल्ली विद्यापीठाबाहेरील कार्यक्रमात लोकांना एनपीआरमध्ये चुकीची माहिती देण्यास सांगितले.
रॉय म्हणाल्या, "जेव्हा अधिकारी एनपीआर डेटासाठी आपल्या घरी येतील तेव्हा त्यांना आपले नाव रंगा-बिल्ला किंवा कुंग-फू आणि पत्ता ७रेस कोर्स रोड असा सांगा." असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. राजीव कुमार नावाच्या व्यक्तीने अरुंधती रॉय यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. अरुंधती रॉय या अशा वक्तव्यांतून नागरिकांची दिशाभूल करत आहेत. तसेच नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार करत आहेत असा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. भाजपने रॉय यांच्या वक्तव्यावर टीका केली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी हा देशद्रोह असल्याचे म्हटले आहे.