मुंबई : 'नाणार' प्रकल्पाच्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. सध्या नाणार प्रकल्पावरून राजकारण चांगलेच तापले होते. या प्रकल्पाला शिवसेनेचा कायमच विरोध होता. नाणार प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या २३ आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या नाणार रिफायनरी प्रकल्पाला मोठया प्रमाणात विरोध होता. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. त्यानंतर आरे कारशेड येथे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानंतर लगेच आता नाणार प्रकल्पासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.