गोष्ट हातातली...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2019
Total Views |




राष्ट्रीय सकल उत्पन्नाचे शुक्रवारी सायंकाळी जाहीर झालेले निराशाजनक आकडे आर्थिक चिंतेत भर घालणारे आहेत. सलग आठ तिमाही राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा प्रवास ऊर्ध्व दिशेने सुरु आहे. परंतु याच्या उलट चित्र गेल्या आठवडयात शेअर बाजारात होतं. कुठल्याही आधाराविना राष्ट्रीय व बॉम्बे निर्देशांक सलग नवनवीन शिखर गाठत होते. पण शुक्रवारी अचानक बाजाराने मूड बदलला आणि दोन्ही निर्देशांक लाल निशाण दाखवून माघारी फिरले. म्हणजेच बाजाराचा तो खेळ सटोडीया लोकांनी सटोडीया लोकांना सट्टाबाजी करून बाहेर काढायला किंवा अडकावयाला रचलेला सापळा होता.

 

काल सरत्या वर्षाचा अखेरचा महिना सुरु झाला. आपण सगळे जण हे वर्ष किती पटकन संपलं? लक्षातच नाही आले. अशा वाक्यांनी सुरुवात करणार आणि ३१ डिसेंबरची वाट बघणार. कशासाठी? तर नविन वर्षात नविन संकल्प सुरु करायचे म्हणून. या महिन्यात सर्व जण नविन वर्षात काय काय सवयी शिस्तबद्धपणे अंगीकारायच्या याची मनातल्या मनात किंवा अगदीच साक्षर लोकं वहीत लिहून यादी बनविणार. मग अर्थसाक्षर जन काय करणार?

 

नोकरीत असलेले कर्मचारी कर बचत नियोजनासाठीची तरतूद करायला सुरुवात करतील. व्यापारी अग्रिम कर भरणा करण्याची तयारी करतील. ज्यांनी जानेवारी २०१९ मधे गुंतवणूकीला सुरुवात करू असे ठरविले होते, ती मंडळी आपला निर्णय तपासून पाहतील. गुंतवणूक सुरु केली असेल तर आढावा घेतील. आणि सुरु केली नसेल तर पुढच्या वर्षी नक्की सुरु करू असं स्वतःलाच वचन देतील. परंतु यावर्षी मी अर्थसाक्षरतेसाठी किती वेळ दिला, वाचन केले किंवा प्रशिक्षण घेतले? असा हिशेब ठेवणारे फार कमी असतील.
 

आर्थिक जगतात होणाऱ्या काही सर्वेक्षणांचा थोडक्यात गोषवारा बघू.

१३० कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या भारतात अति श्रीमंत किंवा ज्यांना अल्ट्रा रिच म्हणतात अशा लोकांची संख्या केवळ ७९७ इतकीच आहे. २०२३ पर्यंत या संख्येत ३८% वाढ अपेक्षित असून ती १,१०१ होईल असा कयास आहे.

 

अॅम्फीच्या अहवालानुसार म्युच्युअल फंडाचे एकूण २.८९ कोटी फोलिओज किंवा खाते आहेत. त्यापैकी सलग ५ वर्षे सुरु असलेल्या खात्यांची संख्या एकूण खात्यांच्या ६०% किंवा १.७५ कोटी इतकीच आहे.१ नोव्हेंबर २०१९ पासून भारतीय स्टेट बँकेने बचत खात्यावरील व्याजाचे दर केवळ ३.२५% इतके केले आहेत. यापेक्षा जास्त परतावा ओव्हर नाईट फंडात मिळतो. स्विस बँकेच्या अहवालानुसार सन २००० ते २०१९ दरम्यान भारतीयांच्या कौटुंबिक संपत्तीत ५.२% वाढ झाली. जागतिक पातळीवर वाढीचा दर भारताच्या निम्मा म्हणजेच २.६% इतकाच होता.

 

म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यास अंदाजे २.९० लाख कोटी रुपये गुंतविले जातात. यापैकी २.५७ लाख कोटी हे एस.आय.पी करणाऱ्या गुंतवणूकदारांकडून येतात. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ५०% लोकांनी आरोग्य विमा घेतलेलाच नाही. निमशहरी अथवा ग्रामीण भागातील केवळ १९% लोकांकडे आरोग्य विमा आहे.

 

वरील मुद्दे लक्षात घेता, ज्या वाचकांनी मागील लेख वाचला असेल त्यांना ५वा पिलर आठवला असेल. वॉरेन बफेंचे स्फूर्तिदायक मेसेजेस फॉरवर्ड करतांना त्यांच्या एका सवयीचे आपण सर्वांनी अनुकरण केले पाहिजे. ते आजही रोज किमान १० तास वाचन करतात. बफेंच्या म्हणण्यानुसार आर्थिक निर्णय पुढे ढकलण्याचे किंवा चुकीचा घेतला जाण्याचे कारण पुढीलप्रमाणे आहे. एक तर आपल्याला माहिती(अभ्यास) नसणे किंवा गरज नसतांना आकर्षक परताव्याला भुलून निर्णय घेणे. उदाहरणार्थ विम्याच्या हफ्त्यात वाढ होणार म्हणून किंवा उच्च परताव्याची योजना बंद होणार म्हणून गुंतवणूक करणे.
 

मुद्दा क्रमांक ५ वरून एका मित्राचे संभाषण आठवले. त्याने रिच डॅडचे पुस्तक वाचले होते. त्यात रॉबर्टने म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू नये असे सुचविले आहे, असे मित्र सांगत होता. प्रस्तुत लेखकाने २००१-०२ च्या दरम्यान लिहिलेल्या पुस्तकांत अमेरिकेच्या म्युच्युअल फंड कार्यपद्धतीविषयी लिहिले असावे, असे माझ्या लक्षात आले. तिकडे फंड व्यवस्थापन हे पॅसिव्हली केले जाते. त्यामुळे भविष्यात गुंतवणूकदारांच्या निधीला धोका होवू शकतो असा त्यांनी अंदाज वर्तविला होता. तो २००८ साली खरा ठरला. मग भारतातल्या गुंतवणूकदारांचे काय होईल? असा मित्राच्या सांगण्याचा मतितार्थ होता.

 

पूर्वीच्या रिलायन्स व आताच्या निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाने १९९५ साली १० रुपये प्रति युनिट दराने सुरु केलेल्या योजनेचा नक्त मालमत्ता मूल्य (NAV) ४ अंकी झाला आहे. ज्या गुंतवणूकदाराने योजनेच्या सुरुवातीला एकरकमी १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल त्याचे आजचे बाजारमूल्य अंदाजे १ कोटी १० लाख रुपये झाले असेल. म्हणजेच वार्षिक २१% चक्रवाढ दराने भांडवली नफा मुद्दलावर मिळविला असेल.

 

You Never Come Home Again! अशा आशयाची एक म्हण आहे. समस्या आणि उत्तर यातलं अंतर म्हणजे Time Factor तसच गुंतवणूक आणि परतावा यांच्यातील अंतर म्हणजे Time Value. तेव्हा निर्णय प्रक्रिया जास्त ताणली तर समय थांबत नाही, हे ताजं उदाहरण तुमच्या डोळ्यांसमोर आहेच. मग हातात असलेली गोष्ट सुटून जाते आणि नविन डाव सुरु करावा लागतो.तुम्ही कधी सुरु करताय?

- अतुल प्रकाश कोतकर

(आर्थिक सल्लागार)

9423187598

[email protected]

(लेखक सशुल्क जोखीमांक चाचणी करून म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुचवितात.)

@@AUTHORINFO_V1@@