गोपीनाथ गडावरील आत्मकथन की एल्गार? (भाग - १)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


एखाद्या नेत्याचा जयंतीचा असा कार्यक्रम खरेतर एक गंभीर औपचारिकता आहे. त्या नेत्यांच्या स्फूर्तीदायक स्मृती जागविणे, हाच तिचा हेतू असू शकतो. प्रासंगिक राजकारण चघळण्यासाठी त्याचा वापर करणे, हे काही औचित्याला धरून ठरू शकत नाही.


१२ डिसेंबर रोजी मराठवाड्यातील परळीजवळील गोपीनाथ गडावर दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मेळाव्यातील गोपीनाथकन्या पंकजा मुंडे, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव उपाख्य नाथाभाऊ खडसे, प्रदेश भाजपाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील प्रभृतींच्या भाषणांमुळे महाराष्ट्रातला भाजप एका नव्या वळणावर येऊन उभा राहिला आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. मुळात हा कार्यक्रम भाजपचा नव्हताच. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने तो आयोजित करण्यात आला होता. यावर्षीच आयोजित करण्यात आला होता, असेही नाही. दरवर्षीच तो आयोजित केला जातो. गोपीनाथ मुंडे असताना तो वाढदिवस म्हणून साजरा केला जात होता. आता ते नसल्याने तो जयंती म्हणून आयोजित केला जातो, एवढाच काय तो फरक. एखाद्या नेत्याचा जयंतीचा असा कार्यक्रम खरेतर एक गंभीर औपचारिकता आहे. त्या नेत्यांच्या स्फूर्तीदायक स्मृती जागविणे, हाच तिचा हेतू असू शकतो. प्रासंगिक राजकारण चघळण्यासाठी त्याचा वापर करणे, हे काही औचित्याला धरून ठरू शकत नाही. शिवाय गोपीनाथ मुंडे यांचे चाहते केवळ भाजपमध्येच आहेत, असे मानण्याचेही कारण नाही. पक्षाबाहेरही किंबहुना कोणत्याही पक्षाशी संबंध नसलेलेही अनेक लोक त्यांचे चाहते आहेत. त्यांना भाजपमधील अंतर्गत कुरबुरींशी काय देणेघेणे? पण त्यांनाही या निमित्ताने जणू वेठीसच धरण्यात आले. यावर्षीच्या कार्यक्रमाला निवडणुकीची व त्यातही पंकजांच्या पराभवाची पार्श्वभूमी असली तरी त्या पराभवाची चिकित्सा करण्याचे जयंती समारंभ हे काही उचित व्यासपीठ असू शकत नाही. तरीही गोपीनाथ मुंडे हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते. त्यांचे जीवनच मुळी भाजपमय होते. त्यामुळे त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम भाजपच्या उल्लेखाशिवाय होणे, हेही अपेक्षित नाहीच. उल्लेख होणारच पण तो श्रद्धांजलीच्या स्वरूपात. तसे झाले असते तर कुणाचा त्याला आक्षेपही राहिला नसता. पण तशा प्रकारचे कोणतेही औचित्य न साधता विद्यमान राजकीय परिस्थितीची व विशेषत: पंकजा मुंडे व त्यांच्या जोडीला रोहिणी खडसे यांच्या पराभवांची चिकित्सा करण्यासाठी आणि भाजपच्या अंतर्गत राजकारणातील कथित विसंगतींशी त्याला जोडण्याचा प्रयत्न करणे, याचे कोणतेही औचित्य नाही. ते न साधल्याने प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व गोपीनाथरावांच्या कन्या अशा दोन्ही नात्यांनी पंकजांनी आपले पिताश्री आणि नेते गोपीनाथराव यांच्या आत्म्याला यातना देण्याचेच काम केले आहे, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.

 

पंकजांना किंवा रोहिणी खडसेंना आपल्या पराभवाची चिकित्सा करण्याचा अधिकारच नाही, असे मला दूरान्वयानेही सूचित करायचे नाही. पण त्यासाठी भाजप हेच योग्य व्यासपीठ आहे व असावेही. त्या व्यासपीठावर पंकजा किंवा नाथाभाऊ या दोघांनाच काय, कुणालाही संधी दिली गेली नसेल तर ते चूकच आहे, असे म्हणता येईल. पण केवळ पराभवाचीच नव्हे तर निवडणूक निकालांचीच चिकित्सा करण्याची भाजपची एक पद्धती आहे. जिल्हा किंवा विभाग किंवा राज्यपातळीवर तशी चिकित्सा झाली पाहिजे. त्यात कुठे, काय उणिवा राहिल्या, याचे विश्लेषणही होऊ शकते. माझ्या माहितीनुसार असे विश्लेषण निवडणुकीनंतर विभागीय व प्रदेश पातळीवर भाजपमध्ये नक्कीच झाले आहे. त्यात निकालाविषयी साधकबाधक चर्चाही झाली. शिवाय निवडणुकीच्या तिकीट वाटपापासून ते निकालापर्यंतच नव्हे तर त्यानंतर घडलेल्या राजकीय घटनांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विविध वाहिन्यांवर मुलाखतींच्या माध्यमातून भूमिका स्पष्टही केली आहे. जाणत्या पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे त्यांनी समर्पक उत्तरही दिले आहे व सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्यांनी ते समजूनही घेतले आहे. पण असे दिसते की, पंकजा, नाथाभाऊ त्याच्याशी सहमत नाहीत. त्याच्याशी असहमत होण्याचा त्यांचा अधिकारही मान्य करता येईल, पण तरीही त्याची चर्चा करण्यासाठी गोपीनाथगडावरचा श्रद्धांजली मेळावा हे व्यासपीठ उचित ठरू शकत नाही. विशेषत: प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वत: चंद्रकांतदादा पाटील तेथे उपस्थित असताना व त्यांनी अभिव्यक्तीच्या मर्यादांकडे आपल्या तेथील भाषणातून लक्ष वेधले असतानाही पंकजा आणि नाथाभाऊ यांनी ज्या आविर्भावात तेथे भाषणे केली, तो राजकारणाची परिपाठी लक्षात घेता त्यांच्या जबाबदारीला शोभणारा नाही. पंकजा या मावळत्या मंत्रिमंडळात मंत्री होत्या. नाथाभाऊ तर विरोधी पक्षनेतेही होते आणि मंत्रीही होते. त्यांच्याकडून अशा वर्तनाची अपेक्षा कुणीही करू शकत नाही. खरे तर मंत्रिपद गेल्यापासून नाथाभाऊ उपलब्ध झालेल्या प्रत्येक संधीचा, त्यांच्यावरील अन्यायाचा उल्लेख करीत आहेत. पण भाजपनेतृत्वाने त्यांना त्यापासून कधीही रोखले नाही. उलट समजावणीचीच भाषा वापरली आहे. शिवाय असे प्रश्न कारवाईने सुटतही नसतात.

 

मुळात कोणत्याही आणि कुणाच्याही पराभवाची मतदार संघश: शेकडो कारणे असू शकतात. बाहेरच्या लोकांना त्याची माहिती नसते. त्या मतदारसंघाचा वा उमेदवाराचा विचार करताना लोक त्या उमेदवाराची प्रतिमा आणि पक्षातील स्थान या आधारेच विचार करतात, पण त्या मतदारसंघातील मतदारांना त्या उमेदवाराच्या व्यक्तित्वाची केवळ माहितीच नसते तर त्याच्या वागणुकीचे अनुभवही असतात. त्या आधारावरच ते मतदान करतात. एका मतदारसंघातील कारणे दुसऱ्या किंवा शेजारच्याही मतदारसंघाला लागू पडत नाहीत. उमेदवाराची निवड, त्याचे पक्षासाठी आणि जनतेसाठी कार्य, कार्यकर्ते आणि जनता यांच्याशी संबंध, त्यांची केलेली कामे, प्रतिस्पर्धी उमेदवार, प्रचारातील मुद्दे, त्यांना लोकांचा मिळणारा प्रतिसाद आणि प्रचाराच्या दरम्यान घडणाऱ्या काही अस्वाभाविक घटना यावर निवडणुकीतील यशापयश अवलंबून असते. सर्वच मतदारसंघात ही कारणे कमी-अधिक प्रमाणात उपस्थित असतातच. त्यांचाच साकल्याने पक्षाच्या पातळीवर विचार होतो व तसा तो भाजपच्या विभागीय व राज्य पातळीवरील बैठकांमधून झाला असेलच. तो मेळाव्यात उगाळण्याचे काही कारणच नव्हते. कारण, एक तर ती कार्यकर्त्यांची बैठक नव्हती. प्रतिवाद करण्याची तिथे कुणालाही संधी नव्हती आणि सामान्य जनतेला तुमच्या अंतर्गत कारभाराशी काही देणेघेणेही नसते. अशा स्थितीत सभेतील भाषणे म्हणजे पक्षनेतृत्वावर भावनेच्या आधारावर दबाव आणण्याचा प्रयत्न ठरतो, असे कुणी म्हटले तर त्यात काय चूक आहे?

 

पंकजा आणि रोहिणी यांच्या पराभवाची वस्तुनिष्ठ मीमांसाच करायची झाल्यास बरेच काही म्हणता येईल. मुळात रोहिणी खडसे यांचा पराभव इतक्या कमी मतांनी झाला की, त्याला पराभव मानताच येत नाही. पण शेवटी पराभव तो पराभवच असतो. म्हणून त्याला पराभव म्हणायचे. त्याचेही मुख्य कारण म्हणजे विरोधी पक्षाने हाताळलेली नाथाभाऊंच्या विरोधातील रणनीती हे दिसते. खरे तर रोहिणी या उमेदवार असल्या तरी लोकांच्या दृष्टीने नाथाभाऊच उमेदवार होते आणि विरोधकांना त्यांनाच पाडायचे होते. आघाडीच्या जागावाटपात मुळात ती जागा राष्ट्रवादीकडे होती. भाजप-सेना वाटपात ती शिवसेनेकडे गेलीही नाही. तेथे शिवसेनेचा अधिकृत उमेदवार नव्हता. पण विरोधकांची रणनीतीच अशी तयार करण्यात आली की, तेथे चंद्रकांतदादा पाटील हा शिवसेनेचा सक्रिय कार्यकर्ता अपक्ष म्हणून उभा राहिला. राष्ट्रवादीने आपले मुरलेले कार्यकर्ते अ‍ॅड. रवींद्र पाटील यांना उमेदवारी दिली होती. पण नाथाभाऊंना पाडणे, हे त्यांचे उद्दिष्ट असल्याने राष्ट्रवादीने त्यांना मागे घेऊन चंद्रकांतदादा पाटील यांना पाठिंबा दिला व ते सर्वपक्षीय उमेदवार बनले. शिवाय रोहिणी खडसे या इच्छेविरुद्धच्या उमेदवार होत्या व ते त्यांच्या देहबोलीवरूनही स्पष्ट होत होते. उमेदवारी अर्ज सादर करायला त्या गेल्या, तेव्हा त्यांचा चेहरा अक्षरश: रडवेला होता व टी.व्ही.वर तो पाहून त्यांनी चेहऱ्यावर हास्य आणावे, असे मी स्वत: तेथील कार्यकर्त्याला कळविले होते. अशा वातावरणात जर त्यांचा हजार-दीड हजार मतांनी पराभव झाला असेल तर तो पराभव ठरत नाही. त्यात गिरीश महाजन यांचा वाटा नसेलच, असे म्हणता येणार नाही. कारण त्यांचे काही समर्थकही त्यांनी समजावल्यानंतर स्थानिक परिस्थितीत वेगळा विचार करू शकतातच व त्या स्थितीत गिरीश महाजन काहीही करू शकत नाहीत. पण पूर्वग्रहांच्या आणि अनुभवांच्या आधारावर कुणाला त्यांना दोष द्यायचाच असेल तर त्यावर काही उपायही नाही. तरीही नाथाभाऊंनी दिलेल्या पुराव्यांचा विचार होऊ शकतोच. बरे एकट्या रोहिणीचाच पराभव झाला असे नाही. शेजारच्या रावेर मतदारसंघातून ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी आमदार व खासदार हरिभाऊ जावळे, अंमळनेरमधील उमेदवार शिरीष चौधरी, मलकापूरमधील चैनसुख संचेती यांचाही पराभव झाला. नाथाभाऊ त्याबद्दल चर्चा करीत नाहीत आणि ओबीसी असल्याने रोहिणीचा पराभव करण्यात आला, हे कसे काय रास्त ठरू शकते? मुळात रोहिणी आणि पंकजा यांच्या पराभवाची कारणे पूर्णपणे भिन्न आहेत. पण एकट्या रोहिणीच्या पराभवाचाच मुद्दा बनणे शक्य नव्हते. म्हणून नाथाभाऊंनी आपले कौशल्य वापरून त्याला व्यापक, ओबीसीचा आयाम दिल्याचे स्पष्टपणे दिसते.

 

- ल. त्र्यं. जोशी

@@AUTHORINFO_V1@@