नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्यासाठी दिल्लीतील जामिया विद्यापीठात झालेल्या आंदोलनाच्या आणि हिंसाचाराच्या घटना या सोशल मीडियावर पसरवण्यात आलेल्या अफवांमुळे झाल्याचा धक्कादायक खुलासा दिल्ली पोलीसांनी केला आहे. आंदोलकांनी केलेल्या जाळपोळीत ६ बसेससह ८ गाड्यांचे नुकसान झाले, हा सर्व प्रकार अफवामुंळे झाला असून अफवा पसवणाऱ्याची ओळख पटली असल्याची माहिती दिल्ली पोलीसांनी दिली.
जामिया विद्यापीठाच्या कुलगुरू नजमा अख्तर यांनी पोलीसांवर विद्यापीठात घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थ्यांना धमकावण्यात आल्याने या प्रकरणी पोलीसांविरोधात तक्रार करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. हिंसाचारात विद्यापीठाचे मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
काय होती 'ती' अफवा ?
दिल्लीत रविवारी झालेल्या हिंसाचारप्रकरणी एक अफवा उठल्याने हा प्रकार घडल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. आंदोलनात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवण्यात आल्याने हा हिंसाचार घडल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. मात्र, या प्रकरणात दोनशे विद्यार्थी जखमी झाल्याचे कुलगुरु नजमा अख्तर यांनी म्हटले आहे.