मुंबई : राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पारित झाल्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन केले. "धाडसी पाऊल !, दृढनिश्चयी कृती!, व्यापक विचार !", अशा शब्दांत पहिली प्रतिक्रीया मुख्यमंत्र्यांनी दिली. "राज्यसभेतील सर्व सदस्यांचे सुद्धा मी आभार मानतो, अभिनंदन करतो. अतिशय महत्वाचे आणि व्यापक असे हे मानवीय पाऊल इतिहासात कायमस्वरूपी कोरले जाईल.", असेही ते म्हणाले.
याच वेळी नागरिकत्व विधेयकाला लोकसभेत समर्थन आणि राज्यसभेत विरोध, अशी दुहेरी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला त्यांनी चांगलाच टोला लगावला. "शिवसेनेने केवळ सत्तेसाठी जी तडजोड केली, आपल्या मूळ विचारधारेला तिलांजली दिली, ते पाहून दुःख झाले. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी जवळीक असलेल्या या विधेयकावर शिवसेनेने केवळ सत्ता टिकविण्यासाठी केलेली तडजोड महाराष्ट्र आणि संपूर्ण देश कायम लक्षात ठेवेल.", अशी खरपूस टीका त्यांनी शिवसेनेवर केली.