नाशिक : "भारतीय अध्यात्मशक्ती देशादेशांमधील परस्परसंबंध टिकवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते," असे प्रतिपादन कॅ. अलोक बन्सल यांनी केले त्या 'सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी'तर्फे आयोजित धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे व्याख्यानमालेप्रसंगी 'भारतासमोरील बदलती भौगोलिक आणि राजकीय आव्हाने' या विषयावर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्टन डॉ.श्रीपाद नरवणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोसला मिलिटरी कॉलेजचे प्राचार्य उन्मेष कुलकर्णी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय मेजर विक्रांत कावळे यांनी करून दिला.
अलोक बन्सल यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, "भारताची सर्वात मोठी समस्या 'ब्रेनड्रेन' आहे. अधिकाधिक तरुण अमेरिकेकडे आकर्षित होत असताना भारतात त्यांना संधी निर्माण करण्याची गरज आहे. चीनची गेल्या काही दशकातील वाटचाल ही साम्यवादाकडून राष्ट्रवादाकडे होते आहे. समुद्रीमार्गाने व्यापार हे चीनचे बलस्थान आहे. येत्या काही वर्षांत चीन माओवादाच्या दिशेने पुन्हा प्रवास सुरू झाला आहे.
आपल्याजवळ भारत म्हणून म्हणून 'आध्यात्मिक शक्ती' असून जग त्याकडे आकर्षित होत आहे आणि त्याचा उपयोग करण्याची गरज आहे. पश्चिम आशिया भागातील कट्टरपंथी देशात आपसात ताणतणावाचे वातावरण आहे. तेलव्यापारामुळे भारत, जपान आणि चीन या देशांना जास्त फरक पडतो. याच देशांमध्ये रोजगार म्हणून भारतीय मनुष्यबळ अधिक आहे. भारतीय व्यापार अधिकाधिक हिंद महासागरातून होतो.
पुढे इतर देशांशी भारताचे असलेले संबंध विशद करताना बन्सल म्हणाले की, "अफगाणिस्तानमधील अधिक लोक हे तालिबानचा विरोध करतात. बांगलादेशमध्ये भारतीय उद्योगांना विशेष साहाय्य मिळते आहे. अवैध स्थलांतर हा शेजारील देशामुळे गंभीर समस्या होते आहे. भूतानसारखा देश लोकशाहीच्या मार्गावर वाटचाल करणारा देश आहे. मालदीव आणि म्यानमार या देशाबरोबरील सांस्कृतिकदृष्ट्या संबंध महत्त्वाचे आहे. नेपाळमधील साम्यवादी सरकार असून थोड्याफार प्रमाणात चीनकडे ओढा आहे. परंतु, भौगोलिकदृष्ट्या भारतावर अवलंबून आहे.
पाकिस्तानमधील वाढती तालिबानी वृत्ती धोकादायक आहे. श्रीलंकासारख्या देशाचे भारताशी संबंध चांगले राहिले आहेत. गुंतवणूक, पर्यटन, सुरक्षा आदी क्षेत्रात एकमेकांचे सहकार्य राहिले आहे. अंतर्गत राष्ट्रविरोधी शक्ती, उग्र डाव्या चळवळी आणि जिहादी दहशतवाद ही भारतासमोरील येणार्या काळातील मोठी आव्हाने आहेत." कार्यक्रमाचे आभार स्नेहा कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता 'वंदे मातरम' गीताने सौरभी भोरे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर विक्रांत कावळे आणि स्नेहा कुलकर्णी यांनी केले.
व्याख्यानमाला
मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळातर्फे संस्थेचे संस्थापक धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम उपाख्य बा. शि. मुंजे यांच्या १४७व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला दि. १०, ११ आणि १२ डिसेंबर रोजी गंगापूर रोड येथील शंकराचार्य न्यासमधील कुर्तकोटी सभागृहात संपन्न होणार आहे.