नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या 'कलम ३७०' संबंधित निर्णयाला विरोध केल्यांनतर आता पुन्हा एकदा पाकिस्तानने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून भारताविरोधी गरळ ओकणे सुरु केले आहे. 'कलम ३७०' वरून जागतिक मंचावर पाकिस्तानला शह देण्यात भारताला यश आले आहे.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांन इम्रान खान यांनी ट्विट केले की, 'भारतीय लोकसभेत मंजूर झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचा मी निषेध करतो. हे केवळ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याचेच नव्हे तर पाकिस्तानबरोबरच्या द्विपक्षीय कराराचे उल्लंघन करते. हे विधेयक म्हणजे हिंदू राष्ट्राच्या रचनेचा एक भाग आहे." यापूर्वीही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या विधेयकाला विरोध दर्शवित एक निवेदन काढले होते.
सोमवारी लोकसभेने मंजूर केलेल्या विधेयकांतर्गत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, शीख, ख्रिश्चन निर्वासितांना आता भारताचे नागरिकत्व मिळू शकेल. शाह म्हणतात की पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे इस्लामी देश आहेत. म्हणून या देशांमध्ये मुस्लिम अल्पसंख्याक नाहीत. हे विधेयक लाखो निर्वासितांना छळापासून मुक्त करण्याचे काम करेल.