राम मंदिर ते राष्ट्रमंदिर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2019   
Total Views |





रामजन्मभूमी मुक्तीआंदोलनात संघ आपल्या पूर्ण ताकदीनिशी उतरला. या सर्व काळातील संघाचे प्रतिनिधी सभेचे जे ठराव आहेत, ते अत्यंत सूचक आहेत. सरकारचा प्रयत्न चालला होता की, अयोध्येची विवादाची भूमी ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करावी. काही लोकांनी राम खरोखरच झाला होता का, याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला, पुस्तके लिहिली. १९८७च्या ठरावात प्रतिनिधी सभेने म्हटले की, समाजात संभ्रम निर्माण करण्यासाठी तथाकथित इतिहासकारांचे लेख आणि विचार यांचा प्रचार करण्याची मोहीम चालविली जात आहे. फक्त रामजन्मभूमीच नव्हे तर रामकथा हीच खोटी आहे, असे सांगण्याचा प्रयत्न चालला आहे.



पहिली कारसेवा १९९० साली झाली
. तेव्हा सरसंघचालक होते, बाळासाहेब देवरस. मोहिते संघस्थानावर दाढी वाढलेला एक स्वयंसेवक उभा होता. बाळासाहेब त्याला ओळखत होते. शेजारीच उभ्या असलेल्या कार्यकर्त्याला त्यांनी विचारले,“त्याने दाढी का वाढविली?” कार्यकर्ता म्हणाला,“जोपर्यंत जन्मस्थानावर मंदिर उभे राहत नाही, तोपर्यंत दाढी करायची नाही, अशी त्याने प्रतिज्ञा केली आहे.” हसून बाळासाहेब म्हणाले,“त्याला सांग, दाढी तळव्यापर्यंत वाढण्याची वाट बघत राहा.” १९९० साली कारसेवा झाली. सर्व हिंदू समाजात प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. त्यामुळे मंदिर दोन-चार वर्षांत होणार, असे लोकांना वाटले. बाळासाहेबांना तसे वाटले नाही. याचे कारण असे की, राजकारण, कायदे, मंदिराला विरोध करणार्‍यांची शक्ती, याचा सर्व अंदाज बाळासाहेबांना परिपूर्ण होता. याला म्हणतात, दूरदृष्टी.



तसा विचार केला तर बाळासाहेब देवरस हेच रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाचे सेनापती होते
. संघात कुठल्याही एका व्यक्तीला, सरसंघचालकांनादेखील संघकामाचे सर्व श्रेय देण्याची पद्धत नसल्यामुळे असे कुणी बोलत नाही. परंतु इतिहास हे सांगतो की, विश्व हिंदू परिषदेला जनआंदोलन करणारी संस्था म्हणून उभी करण्यात बाळासाहेबांनी घेतलेले निर्णय कारणीभूत झालेले आहेत. मोरोपंत पिंगळे यांना त्यांनीच विश्व हिंदू परिषदेच्या कामासाठी पाठविले. मोरोपंत तसे विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी नव्हते. त्यांनीच आपल्या प्रतिभेने रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाला दिशा दिली. १९९० ची कारसेवा, शिलान्यासाचा कार्यक्रम, राम मंदिरासाठी प्रत्येक खेड्यातून एक वीट (रामशिला) घेऊन जाण्याचा कार्यक्रम, अशा विविध कार्यक्रमांमुळे रामजन्भूमी मुक्ती आंदोलन हे जनआंदोलन झाले. स्वातंत्र्यानंतर फार मोठे जनआंदोलन उभे करण्याचे काम संघ माध्यमातून तशा अर्थाने प्रथमच झाले.



रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात संघाची भूमिका प्रारंभापासून अतिशय स्पष्ट आहे
. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही. वैचारिक गोंधळ नाही आणि धोरणात्मक गोंधळदेखील नाही. जी भूमिका रामजन्मभूमी संदर्भात १९८६ साली घेतली गेली, त्या भूमिकेत कोणतेही अंतर पडलेले नाही. सरकार प्रतिकूल आहे म्हणून नरमाईची भूमिका घेतली पाहिजे किंवा १९९३ साली रामजन्मभूमी प्रश्नावरून नरसिंह राव सरकारने संघावर बंदी घातली होती, म्हणून संघाने पडखाऊ धोरण स्वीकारले नाही. १९९८ साली अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार आले. सरकारला अडचण नको म्हणून रामजन्मभूमीचा विषय संघाने शीतपेटीत टाकला नाही. तसेच २०१४ साली नरेंद्र मोदींचे शासन आले. त्यांनाही अडचण नको म्हणून संघाने रामजन्भूमीचा विषय बाजूला ठेवलेला नाही. संघ आपल्या भूमिकेवर ठाम आहे.



रामजन्मभूमीवर बाबराने बांधलेले तीन घुमट होते
. त्यातील एक घुमट रामाच्या जन्मस्थानावर होता. तेथे बालरामाची मूर्ती होती. हिंदीत तिला ‘रामलला’ म्हणतात. तिची पूजाअर्चा होत असे. देशभरातून भाविक श्रद्धेने दर्शनासाठी येत. स्थानाचा विवाद चालू होता. शासनाने रामललाच्या स्थानाला टाळे ठोकले. म्हणजे राम तुरुंगात गेला. तरुण रामाला चौदा वर्षांचा वनवास कैकयीने घडविला. कलियुगातील कैकयांनी बालरामाला ३३ वर्षांचा कारावास घडविला. न्यायालयाने हे टाळे काढून टाकण्याचा आदेश दिला. रामललाच्या मंदिराचे दरवाजे उघडले. अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने १९८७ साली याबद्दल एक ठराव केलाया ठरावातील महत्त्वाचा भाग असा : टाळे उघडले गेल्यामुळे भारतीय संस्कृतीप्रेमिकांच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. रामजन्मभूमी मुक्ती यज्ञ समिती, विश्व हिंदू परिषद आणि सर्व साधू-संतगण यांच्याविषयी कृतज्ञता भाव व्यक्त केला गेला आहे. ठरावातील पुढचा भाग असा -

* आपल्या पूर्वजांविषयीची श्रद्धा कोणत्याही देशाच्या राष्ट्रीयतेचे आधारभूत अंग असते.

* इंडोनेशियातील मुसलमानांनी श्रद्धेने राम, कृष्ण, सीता यांना आपले राष्ट्रीय आदर्श मानलेले आहे. भारतातील मुसलमानांनीदेखील त्याचे पालन केले पाहिजे.

* विदेशी आक्रमक बाबर, तो मुसलमान होता म्हणून त्याच्याशी नाते जोडणे योग्य नाही.

* मुस्लीम समाजाला प्रतिनिधी सभेने आवाहन केले की, फुटीरतावादी मानसिकतेतून त्यांनी लवकरात लवकर बाहेर पडावे.



रामजन्मभूमी विषयावरचा हा संघाचा पहिला ठराव आहे
. रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात संघाने उतरण्याचे कारण काय? संघ ज्यांना समजत नाही, अशी मंडळी संघावर ‘कट्टर धार्मिक संघटन’ असल्याचा आरोप करतात आणि ज्यांची हयात संघात जाते, असे माझ्यासारखे जेव्हा संघात धार्मिकता शोधू लागतात, तेव्हा ती कुठे सापडत नाही. संघाच्या एका तासाच्या शाखेत कोणत्याही देवतेची पूजा, आरती होत नाही. संघशाखेचा सत्यनारायणाचा कार्यक्रम नसतो. संघशाखेचा गणपती बसविला जात नाही. संघशाखेतून अमुक उपवास करा, अमुक तीर्थयात्रा करा, पंढरपूरची वारी करा, असे काहीही सांगितले जात नाही. देवदेवतांच्या बाबतीत संघ स्वयंसेवक तटस्थ असतो.







मी अनेक प्रचारकांच्या फार जवळ राहिलो
. दोन उदाहरणे देतो. शिवराय तेलंग आणि दामूअण्णा दाते. या दोघांनाही मी कधी देवळात जाताना पाहिले नाही. कोणता उपवास करताना ते दिसले नाहीत. जन्मात त्यांनी कधी कुठली तीर्थयात्रा केली नाही. संघ कट्टर धर्मवादी आहे, पण संघाचा धर्म नैतिक आचरणाचा आहे, चारित्र्य निर्मितीचा आहे, व्यक्ती-व्यक्तीतील स्नेेहमय संबंधांचा आहे. संघाचा राष्ट्रीय धर्म आहे. हे सनातन राष्ट्र आहे. त्याची एक जीवनपद्धती आहे. त्याची मूल्यव्यवस्था आहे. ही मूल्य जगणारी थोर माणसे झाली. श्रीराम त्यातील एक. कर्तव्याचा आदर्श म्हणजे राम. आदर्श बंधू, आदर्श पती, आदर्श पुत्र, आदर्श राजा, म्हणजे राम. हा राम भारतातील प्रत्येकाच्या मनात असतो. जे स्वतःला ‘हिंदू’ म्हणतात, त्यांच्या मनात त्याचे स्थान अढळ असते. जे आपले हिंदूपण विसरले आणि बळजबरीने मुसलमान, ख्रिश्चन झाले, त्यांच्याही रक्तात ‘राम’ असतोच.

 


हा राम आपला राष्ट्रीय आदर्श आहे
. राम आहे, तर आपला देश आहे. राम असेल तर आपल्या देशात आणि जीवनात ‘राम’ आहे. त्याची श्रद्धा जागविणे म्हणजे दगडाच्या प्रतिमेची किंवा धातूच्या प्रतिमेची पूजा नव्हे. ते त्याचे रूप आहे. पार्थिव रूपातील राम, मूर्ती रूपातील रामासारखाच होता, असे कुणी सांगू शकत नाही, पण कर्तव्य पालन करणारा राम एकच असतो. आपला देश वेगळी ओळख असलेला देश आहे आणि ही वेगळी ओळख ज्यांनी घडवून दिली, त्यात रामाचे स्थान अद्वितीय आहे. अशा रामाच्या जन्मस्थानावर बाबरने हल्ला केला. मंदिर पाडले, त्याजागी मशीद बांधली. बाबराला मशीद बांधायची होती तर अयोध्येत जमीन भरपूर होती. तो कुठेही बांधू शकत होता. पण, तो आक्रमक होता, त्याला भारतावर राज्य करायचे होते. भारतावर राज्य म्हणजे हिंदूंवर राज्य करायचे होते. राज्य करण्यासाठी त्यांचे मानसिक खच्चीकरण करणे आवश्यक होते. त्यांच्या श्रद्धा भंग करणे आवश्यक होते. ‘मी मंदिर पाडू शकतो, मला हात लावायची कुणात हिम्मत आहे काय?’ हा त्याचा संदेश होता. त्याने मंदिर पाडणे आणि मंदिराच्या खांबावरच मशीद उभी करणे, हा केवळ एक प्रार्थनास्थळ गेले आणि दुसरे उभे राहिले, एवढा बदल नाही. हे आमच्या सेक्युलर महापंडितांना समजत नाही. त्यांना बाबराचे जोडे चाटण्यात धन्यता वाटते.



हा बदल दोन संस्कृती बदलांचा निदर्शक आहे
. एक आहे आक्रमक बाबराची, रानटी, अतिशय हिंसक, कमालीची असहिष्णू, सर्व मानवी मूल्ये पायदळी तुडवणारी, बापाला बाप न म्हणणारी आणि आईला आई न म्हणणारी संस्कृती आणि दुसरी संस्कृती आहे ‘पितृवचना लागे रामे वनवास केला’ हे मूल्य जपणारी. बाबराने आपली मानवी मूल्यांची संस्कृती अयोध्येत उद्ध्वस्त केली आणि त्याजागी स्वतःच्या रानटी संस्कृतीची निशाणी उभी केली. काळ विपरीत होता. आपण दुर्बल झालो होतो. महाशक्तिशाली रामाचे तेज आपण हरवून बसलो. रामबाणाची मारकता अत्यंत क्षीण झाली. त्याची असंख्य कारणे आहेत आणि जसजशी ही कारणे मिटत चालली तसतशी रामशक्ती, रामअनुभूती हिंदू जनतेत निर्माण होऊ लागली. आपण दुर्बल असतानादेखील रामजन्मस्थानावरील बाबरी ढाँचा जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न आपल्या पूर्वजांनी केला. चारशे वर्ष हा संघर्ष चालला. चाराच्या पटीत कैक हजार लोक त्यात हुतात्मा झाले. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही आणि त्यामुळे राजीव गांधींना मंदिराचे टाळे काढावे लागले आणि पुढे जाऊन शिलान्यासाची अनुमती द्यावी लागली. हा केवळ मंदिर बांधण्याचा खटाटोप नाही. आपला पिंड मूर्तीपूजेचा. तसाच नवनवीन देवता निर्माण करण्याचा. त्यामुळे देशात रोज कुठे ना कुठे मंदिर बांधण्याचा उपक्रम चालूच असतो. काहीजण अतिभव्य मंदिर बांधत बसतात. या मंदिराच्या संख्येत अयोध्येतील रामाचे आणखी एक मंदिर, असा हा विषय नाही आणि राम मंदिरात असतो, असेही नाही. हे कुणी आणखी दुसर्‍याने संघाला सांगायची गरज नाही. मग तरीही अयोध्येत राम मंदिर का पाहिजे?



माणसाला जगण्यासाठी जसे बळ लागते
, तसे राष्ट्राला उभे राहण्यासाठी बळ लागते. व्यक्तीचे बळ त्याच्या शिक्षण, संस्कार आणि धनात असते. राष्ट्राचे बळ, राष्ट्राच्या अस्मितेत असते, राष्ट्राच्या श्रद्धेत असते. ही श्रद्धाकेंद्रे उभी करावी लागतात. त्याची जपणूक करावी लागते. ही श्रद्धा केंद्रे राष्ट्राची जपणूक करतात. अमेरिकेचे उदाहरण घेऊया. न्यूयॉर्कच्या लिबर्टी बेटावर ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ उभा आहे. ९३ मीटरचा हा स्टॅच्यू आहे. अनेक वर्ष त्याचे काम चालले. अमेरिकेच्या अस्मितेचे ते प्रतीक आहे. तो उभा करण्यासाठी करोडो डॉलर लागले. अनेकजण हे अवघड काम करताना प्राणास मुकले. तेथे कुणी असा प्रश्न उभा करणारा झाला नाही की, कशाला ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ पाहिजे? त्याऐवजी हॉस्पिटल काढा, शाळा काढा. असं जर कुणी बोलला असता तर, अमेरिकेत रस्त्यावर शेण मिळत नसल्याने अमेरिकन जनतेने त्याच्या तोंडात काय घातले असते, हे मी सांगू शकत नाही.



अमेरिकेचे दुसरे उदाहरण आहे
. साऊथ डकोटा या राज्यात माऊंट रशमोर (रशमोर पर्वत आहे) या पर्वतावर अमेरिकेचे राष्ट्रनिर्माते जॉर्ज वॉश्गिंटन, थॉमस जेफरसन, अब्राहम लिंकन आणि थिओेडोर रुझवेल्ट यांची भव्य शिल्पे आहेत. आकाराने महाकाय आहेत. एक-एक शिल्प जवळजवळ १८ मीटरचे आहे आणि फक्त चेहरेच आहेत. ते बघण्यासाठी दरवर्षी २०-२५ लाख अमेरिकन जातात. हे शिल्पाचे काम चालू असताना, कुणी असा प्रश्न केला नाही की, ‘या शिल्पांची गरज काय? तेवढ्याच पैशात आपण हॉस्पिटल बांधू, गरिबांना अन्न देऊ.’ असा जर तिथे कुणी काही बोलला असता तर त्याच्या डोक्यावर अमेरिकन माणसाने डोंगर पोखरून जी खडी बाहेर काढलेली होती, ती हाणली असती. राष्ट्राला अस्मिता देण्यासाठी त्याच्या महापुरुषांच्या स्मृती जागृत ठेवाव्या लागतात. बाबर, अकबर, औरंगजेब हे आमचे राष्ट्रपुरुष नव्हेत. हे आक्रमक आणि रक्तपिसाट नराधम होते. त्यांचे आमच्यावरील राज्य हा एक काळा अध्याय आहे. आमचा देश रामाचा देश आहे. त्याची स्मृती जागृत ठेवणे, म्हणजे राष्ट्रपुरुषाची स्मृती जागृत ठेवणे आहे. संघाचे काम हेच मुळी राष्ट्रीय काम आहे. संघाचे विषय राष्ट्रीय असतात. जे राष्ट्रहिताचे ते संघाचे. जे राष्ट्र मारक आणि घातक त्याचा विनाश, हाच संघाचा ध्यास. संघाचे अवतारकार्य याच्यासाठीच आहे.



रामजन्मभूमी मुक्तीआंदोलनात संघ आपल्या पूर्ण ताकदीनिशी उतरला
. या सर्व काळातील संघाचे प्रतिनिधी सभेचे जे ठराव आहेत, ते अत्यंत सूचक आहेत. सरकारचा प्रयत्न चालला होता की, अयोध्येची विवादाची भूमी ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करावी. काही लोकांनी राम खरोखरच झाला होता का, याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला, पुस्तके लिहिली. १९८७च्या ठरावात प्रतिनिधी सभेने म्हटले की, समाजात संभ्रम निर्माण करण्यासाठी तथाकथित इतिहासकारांचे लेख आणि विचार यांचा प्रचार करण्याची मोहीम चालविली जात आहे. फक्त रामजन्मभूमीच नव्हे तर रामकथा हीच खोटी आहे, असे सांगण्याचा प्रयत्न चालला आहे. या इतिहासकारांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की, करोडो हिंदूंच्या हृदयात युगानुयुगे रामाची प्रतिमा आहे आणि रामजन्मस्थानाविषयी पूर्ण श्रद्धा हिंदूंच्या मनात आहे. या भंपक इतिहासकारांच्या प्रमाणपत्रांची त्यांना गरज नाही.



हिंदू समाजाचे दुर्दैव असे आहे की
, त्याला संघर्ष हिंदूंशीच करावा लागतो. राम झाला की नाही, रामायण खरे की खोटे, रामाच्या जन्मतारखेचा दाखला आहे की नाही, वानर रूपातील हनुमान खरोखरच अस्तित्त्वात होता का? असले प्रश्न मुसलमान विचारत नाहीत, ख्रिश्चन विचारत नाहीत. विचारणारे हिंदूच असतात. ते स्वतःला पंडित समजतात, इतिहासकार समजतात, संशोधक समजतात. माध्यमांत त्यांचे भाऊबंद बसलेले असतात. ते त्यांना प्रसिद्धी देतात आणि सत्तेत बसलेले तुष्टीकरणवादी त्यांना संरक्षण देतात. त्यांची ताकद खूप मोठी आहे. त्याविरुद्ध सामान्य हिंदू संघटन लढू शकत नाही. त्यांच्या आवाजाला हे महापंडित भीक घालत नाहीत. संघाचे तसे नाही. संघ ही दुर्बल संघटना नाही. संघाची संघटनेची ताकद अफाट आहे. मनात आणले तर सगळा समाज ढवळून काढण्याची शक्ती संघात आहे. म्हणून संघ जे काही म्हणतो, ते शक्तीस्थानावरून म्हणतो. म्हणणारी एक व्यक्ती असते. त्या-त्या काळात सरसंघचालकांनी या भूमिका मांडण्याचे काम केले. बाळासाहेबांनी स्वच्छ शब्दांत सांगितले की, परकीय इस्लामी आक्रमकांनी हजारो मंदिरे पाडली. पण आमची मागणी फक्त तीन मंदिरासंबंधी आहे. श्रीकृष्ण जन्मस्थान, काशी विश्वेश्वर, रामजन्मभूमी. त्याबाबतीत तडजोड नाही. हीच भूमिका नंतर रज्जूभय्यांनी आणि सुदर्शनजींनी मांडली. सुदर्शनजींच्या काळातच साबरमती एक्सप्रेसमधील कारसेवकांना जिवंत जाळण्याचे कारस्थान घडले. हिंदू समाजाने रामशक्ती दाखवली. केवळ भात्यात कुजत असलेले बाण बाहेर काढले आणि आपले तेज प्रकट केले. राम, जनमनात प्रकट व्हायला लागला होता.



या भावनेचे प्रतिबिंब २००६ साली अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने केलेल्या ठरावात आपल्याला दिसेल
. या ठरावाची एक पार्श्वभूमी आहे. विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाची बैठक १६ व १७ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे झाली. या ठरावात जन्मभूमीवर श्रीरामाचे मंदिर शीर्घ बांधले जाण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. दिल्लीत तेव्हा इटालियन सोनिया गांधींची सत्ता होती. या ठरावाला अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने पाठिंबा दिला. ठराव म्हणतो की, २ लाख, ७५ हजार खेड्यांतून करोडो हिंदूंनी १९८९ साली श्रीरामाचे मंदिर जन्मस्थानावर उभे केले जावे, या रामजन्मभूमी न्यासाच्या मागणीला पाठिंबा दिला. (रामशिला पाठविल्या) रामाच्या मंदिराची प्रतिकृती घरोघर पोहोचली. सर्व हिंदू भावनिकदृष्ट्या या प्रतिकृतीशी संलग्न झालेले आहेत. प्रतिकृतीप्रमाणे पत्थर कटाईचे काम अयोध्येत सुरू झाले. अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने सर्व हिंदूंना रामजन्मभूमी मंदिराचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी निर्धारपूर्वक आंदोलनाच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले.



केंद्रात इटालियन सोनिया गांधींचे सरकार असताना आणि कळसूत्री पंतप्रधान असताना मंदिराचा विषय पुढे जाणे शक्य नव्हते
. सोनिया गांधींच्या तो आस्थेचा विषय नव्हता आणि मनमोहन सिंग यांच्या सेक्युलर राजकारणाचा तो विषय नव्हता. हिंदूंची मनस्थिती बदलत चालली होती. त्यांच्यातील रामतत्त्व आता हळूहळू जागे होऊ लागले होते. रावणशाही त्यांना समजू लागली होती. काळ बदलतो तसे रावण बदलतात. रामाच्या काळातील रावणाला दहा तोंडे होती. याचा अर्थ असे की, त्याची दहा शक्तिस्थाने होती. तुष्टीकरणवादाच्या काळात आणि बेगडी सेक्युलॅरिझमच्या काळात तोंडे दहाच राहिली, परंतु त्यांची रूपे बदलली. सेक्युलर, डावे, जडवादी, चंगळवादी, मॅकोलेपुत्र, मार्क्सपुत्र, नेहरूपुत्र, तुष्टीकरणवादी, संस्कृतीभंजक, हिंदू निंदक, अशी ही दहा तोंडे झाली. त्यांनी खूप आग आणि विष हिंदू समाजावर ओकले. हिंदू, शंकराचाच अवतार असल्यामुळे ते विष त्याने प्राशन केले, पण त्याला काही झाले नाही.



त्याची पाचनशक्ती अफाट आहे
. त्याचा एवढाच परिणाम झाला की, त्याच्या मनात झोपलेले रामतत्त्व जागे होऊ लागले आणि त्याच्या लक्षात आले की, नुसत्या धार्मिक यात्रा, तीर्थयात्रा, देव-देवतांचे पूजा-महोत्सव उपयोगाचे नाही. आता वेळ मतपेटीच्या पूजेची आलेली आहे. ते त्याने १९९८ पासून सुरू केले आणि २०१४ आणि नंतर २०१९ साली ही पूजा काय असते, हे जगाला दाखवून दिले. तुष्टीकरणवाद्यांचे सरकार २०१४ साली जाऊन रामभक्तांचे सरकार आणण्यात झाले. जनतेची अपेक्षा अशी राहिली की, आता सरकारने कायदा करावा. रामजन्मभूमी आपल्या ताब्यात घ्यावी आणि तेथे भव्य मंदिर बांधावे. प्रकरण न्यायालयात होते. २०१८च्या विजयादशमीच्या उत्सवात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सरकारने आता कायदा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले की, “रामजन्मभूमी हा श्रद्धेचा विषय आहे. हा विषय राजकारणाचा नाही.” कुंभमेळ्यात भाषण करताना त्यांनी सांगितले की, “रामजन्मभूमीवर रामाचे भव्य मंदिर उभे राहिले पाहिजे. शासनाने हे काम केले तर त्यांना भगवान रामाचा आशीर्वाद मिळेल.”


रामजन्मभूमी मुक्ती आंदोलन
, शिलान्यास, कारसेवा, बाबरी ढाँचा जमीनदोस्त, जमिनीचे सरकारी अधिग्रहण, अलाहाबाद हायकोर्टाचा जमीन विवादाचा निर्णय आणि जमिनीचे त्रिभाजन, सर्वोच्च न्यायालयातील खटला आणि जमिनीच्या मालकीचा विषय, असा सर्व प्रवास आहे. सर्वोच्च न्यायालयात जन्मस्थानावर मंदिर होते की नाही, हा विषय नव्हता, तर जमिनीची मालकी कुणाकडे आहे, हा होता. गुंतागुंतीचे प्रश्न केवळ कायद्याने सुटत नाहीत. ज्या विषयामागे धर्म आहे, न्याय आहे, ते प्रश्न धर्म-न्यायाचे आहेत म्हणून निकाली होत नसतात. श्रीकृष्णाचा भगवद्गीतेत एक शाश्वत संदेश आहे - ‘धर्माचा प्रश्न सोडवायचा असला तर त्याच्यामागे शक्ती उभी केली पाहिजे.’ रामदास स्वामींनी संदेश देऊन ठेवला आहे की, ‘दुर्बलाला जगात कुणी विचारत नाही.’ ‘शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे, शक्ती-युक्ती जये ठायी, तेथे श्रीमंत धावती।



संघाने शक्तीने आणि युक्तीने रामभक्तांच्या हाती राज्य जाईल
, हे पाहिले. रामजन्मभूमी मुक्तीआंदोलनाने केलेले हे नवयुग निर्माण करणारे प्रवर्तन आहे. रामभक्तांनी तुष्टीकरणवाद्यांची कबर बांधलेली आहे. या आंदोलनाचा हेतू तुष्टीकरण वाद संपविणे, हा होता. त्यात चांगले यश मिळालेले आहे. शंभर टक्के यशासाठी आज काही काळ थांबावे लागेल. रामजन्मभूमी मुक्तीआंदोलनाचा दुसरा विषय घटनेचे ३७० कलम रद्द करण्याचा होता. हे कलम तुष्टीकरणाचे श्रीखंड होते. ते आता मृतखंड झाले आहे. रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाचा तिसरा विषय समान नागरी कायद्याचा आहे. तिहेरी तलाक संपला. आता समान नागरी कायद्याची वाट प्रशस्त झाली आहे.



हे एक राष्ट्र आहे
. हे हिंदूराष्ट्र आहे. हिंदू राष्ट्रात राहणारे सगळे हिंदू आहेत. पूजापद्धती भिन्न असतील. कुणी मशिदीत जातो, कुणी गुरुद्वारात, कुणी चर्चमध्ये, कुणी अग्यारीत, तर कुणी विहारात. आम्ही सर्व एका राष्ट्राचे अंग आहोत. हिंदू राष्ट्राचे अंगभूत घटक आहोत. ही भावना सर्व समाजात जागृत करून एक शक्तिशाली राष्ट्र उभे करणे, म्हणजे भव्य राम मंदिर उभे करणे आहे. लौकिकाने राम मंदिर दगड, चुना, विटा यांनी बांधले जाईल. ते बांधण्याचा कालखंड आता जवळ आला आहे. ते थांबविण्याची आता कुणात शक्ती नाही. जे मूर्खपणाने तसा प्रयत्न करतील, ते अही मही रावणाच्या वाटेने जातील. परंतु, या राम मंदिरातून जे राष्ट्रमंदिर उभे राहील, ते दगड, चुना, विटा यांचे नसेल. ते जिवंत माणसांचे असेल. आत्मिय भावनेने एकमेकांशी जोडलेली, समरसतेचा व्यवहार करणारी, परस्परपूरक जीवन जगणारी, ही राष्ट्रीय जनता असेल. मंदिरातून राष्ट्र मंदिराकडे जाण्याचा हा प्रवास आहे.

@@AUTHORINFO_V1@@