मानव जीवन अमूल्य आहे. सत्यज्ञानाच्या आचरणाने सतत या जीवनाला पवित्र केले पाहिजे. अगदी लहान-लहान उपदेश ग्रहण करीत पुण्यसंचय करीत राहिल्याने आपली जीवनयात्रा सार्थक ठरते. ज्याप्रमाणे मुंग्या मातीचा एक-एक कण जमवून वारुळ तयार करतात किंवा मधमाशा माधुर्याचा छोटा-छोटा अंश संग्रहित करून मधाचे पोळे तयार करतात, तद्वतच माणसानेदेखील अगदी छोटी-छोटी सत्यतत्त्वे, धार्मिकता, प्रामाणिकपणा, नीतिमूल्ये यांचा संग्रह करीत त्यांना जीवनात धारण करावे आणि आपल्या पुण्यकर्मात वाढ करीत राहावे.
मा स्रेधत सोमिनो दक्षता महे
कृणुध्वं राय आतुजे ।
तरणिरिज्जयति क्षेति पुष्यति
न देवास: कवत्नवे॥
(ऋग्वेद-7.32.9)
अन्वयार्थ
हे (सोमिन:) ऐश्वर्यसंपन्न, ज्ञानी लोकहो! तुम्ही (मा स्रेधत) हिंसा करू नका. (महे) आपले महत्त्व, ख्याती, यश वाढविण्याकरिता (दक्षत) सुदक्ष, तत्पर, उत्साही राहा. (आतुजे) सर्वप्रकारच्या बळ, शक्तीकरिता व (राये) धनाकरिता (कृणुध्वम्) प्रयत्न करा, उद्योग करा! कारण, (तरणि:) संकटांना पार करणारा रक्षकच (जयति), जिंकतो आणि (क्षेति) आनंदाने राहतो. तसेच तो (पुष्यति) पुष्ट, मजबूत बनतो. (देवास:) विद्वान लोक, निसर्गातील सर्व दिव्यतत्त्वे, शक्ती (कवत्नवे) कृत्सित-वाईट आचार विचारासाठी कधीच (न) प्रयत्नशील नसतात.
विवेचन
मानव जीवन अमूल्य आहे. सत्यज्ञानाच्या आचरणाने सतत या जीवनाला पवित्र केले पाहिजे. अगदी लहान-लहान उपदेश ग्रहण करीत पुण्यसंचय करीत राहिल्याने आपली जीवनयात्रा सार्थक ठरते. ज्याप्रमाणे मुंग्या मातीचा एक-एक कण जमवून वारुळ तयार करतात किंवा मधमाशा माधुर्याचा छोटा-छोटा अंश संग्रहित करून मधाचे पोळे तयार करतात, तद्वतच माणसानेदेखील अगदी छोटी-छोटी सत्यतत्त्वे, धार्मिकता, प्रामाणिकपणा, नीतिमूल्ये यांचा संग्रह करीत त्यांना जीवनात धारण करावे आणि आपल्या पुण्यकर्मात वाढ करीत राहावे. हळूहळू वाईटांचा त्याग आणि चांगल्याचा स्वीकार करीत राहिल्यास जीवनाचा सन्मार्ग सुकर होतो आणि आपला प्रवास यशस्वी ठरतो.
सदरील मंत्रात मानवाला मौलिक बाबींचा उपदेश केला आहे. यांचे पालन केल्यास मानव सर्वदृष्टीने विकसित होतो. उपदेश ग्रहण करणारा सुपात्र असावा. म्हणूनच ‘सोमिन:’ असे संबोधले आले आहे. जे सोमगुणांनी परिपूर्ण असतात, ते ‘सोमिन:!’ सुवति ऐश्वर्यवान् भवतीति सोम:। ‘षु’ धातूपासून बनलेल्या ‘सोम’ शब्दाचा अर्थ सद्गुणांना, शीतलतेला व मधुरतेला व ऐश्वर्यादी तत्त्वांना उत्पन्न करणारा असा होतो. ‘सोम’ म्हणजेच ईश्वरदेखील! पण, इथे ‘उत्तम गुणांनी युक्त मानवसमूह’ असा अर्थ द्यावयास हवा. एखाद्याला उपदेश करावयाचा असेल, तर त्याला चांगल्याच संबोधनाने प्रोत्साहन द्यावयास हवे. कारण, यामुळे तो सत्कर्म करण्यास प्रवृत्त होऊ शकतो. म्हणून ‘सोमिन:’ हे संबोधन सार्थक मानले जाते.
पहिला उपदेश आहे. ‘मा स्त्रेधत।’ म्हणजे हिंसा करू नकोस. हिंसेने हिंसा वाढते. आज सार्या जगात हिंसक घटनांचे साम्राज्य पसरले आहे. केवळ प्राण्यांच्याच नव्हे तर माणूस हा माणसांच्याच हत्या करतोय. यावर एकच उपाय म्हणजे ‘अहिंसा!’ आपली संस्कृती व समग्र वैदिक वाङ्मय हे अहिंसा तत्त्वावर आधारलेले आहे. म्हणूनच म्हटले आहे- ‘अहिंसा परमो धर्म:।’ महर्षी पतंजलींनी ‘अष्टांगयोगा’त पहिल्या ‘यम’ अंगामध्ये अहिंसेला प्रथम स्थान दिले आहे. केवळ शरीरानेच नव्हे, तर वाणी व मनाने सर्व काळी सर्व प्राण्यांबाबत शत्रुत्वाची भावना न बाळगता त्यांचेशी प्रेमपूर्ण व्यवहार करणे म्हणजे अहिंसा होय!
मन, वचन व शरीराने कोणास थोडादेखील त्रास होता नये. ही पराकोटीची अहिंसा होय. अहिंसेचे हे सार्वभौमिक दिव्य व्रत ज्याने जोपासले, तो महान झालाच समजा! इतिहासाची पाने अशा अहिंसावादी सत्पुरुषांच्या सहकर्मांनी सजलेली आहेत. नुकतीच राष्ट्रपिता म. गांधी यांची दीडशेवी जयंती साजरी करण्यात आली. या महात्म्याने अहिंसा व सत्य तत्त्वांचे मोठ्या निष्ठेने पालन केले. त्यांनी जुलमी ब्रिटिशांविरोधात दिलेला ‘अहिंसक लढा’ हा जगाचे लक्ष वेधून घेतो व भारतासह जगातील असंख्य महापुरुषांना प्रभावित करतो. ही ती मोठी आश्चर्याची घटना! म. गांधी सोबतच इतरही असंख्य संत-महात्म्यांनी ‘मा स्त्रेधत’ या वेदाज्ञाचे श्रद्धेने पालन केले आहे. दुसरा उपदेश आहे - ‘महे दक्षत।’ आपले सुयश, कीर्ती व माहात्म्य वाढविण्याकरिता नेहमी तत्पर राहा. ‘मह’ म्हणजे महानता. वैदिक संध्येत परमेश्वराला ‘मह:’ म्हटले आहे. ईश्वर महान आहे. त्याची महत्ता सर्वत्र पसरली आहे. मानवाने आपले दिव्यत्त्व वाढविण्याकरिता नेहमी तत्पर असावे. अशी शुभकर्मे करावीत की ज्यायागे आपले चहुकडे यशोगान व्हावे. सुभाषितकाराने अशा यशवंतांविषयी म्हटले आहे.
‘स जातो येन जातेन याति वंश समुन्नतिम्।’
ज्याच्या जन्मामुळे सारे वंश सर्वोत्तम कीर्तीला पोहोचते, त्याचाच जन्म सार्थक! आपल्या आचरणातून कोणतेही अनिष्ट कार्य घडता नये. आपले जीवन थोडेदेखील अधोगतीला प्राप्त होणार नाही, याची दक्षता व काळजी घ्यावी. ‘मृच्छकटिक’ नाटकाचा नायक चारुदत्त आपल्या कीर्तिरूप चरित्राचे नेहमीच रक्षण करतो. कोणत्याही प्रकारचा कलंक लागू न देता मृत्यू येणे म्हणजे साक्षात पुत्र जन्माचा ‘आनंदोत्सव’ होय असे तो मानतो. ‘विशुद्धस्य हि मे मृत्यु: पुत्रजन्मसम: किल।’ तिसरा उपदेश आहे - ‘आतुजे राये कृणुध्वम्।’ म्हणजे सर्व प्रकारचे बळ, सामर्थ्य व शक्ती आणि ऐश्वर्य वाढविण्याकरिता प्रयत्न करा. शारीरिक, मानसिक, आत्मिक व सामाजिक सामर्थ्य वाढविण्याकरिता सत्यज्ञान आणि पवित्र आचरण हवे! या सत्य वैदिक ज्ञानाद्वारे पुरुषार्थ करण्यासाठी मानव जन्म मिळाला आहे. जो धनैश्वर्य आणि सर्वविध बळाच्या प्राप्तीकरिता प्रयत्न करीत नाही. म्हणजेच उद्योगात रमलेला नाही, त्याच्या जीवनात रामच उरला नाही, असे आपण मानतो. अशा आराम करणार्यांना धनवैभव मिळणार तरी कसे? तो निश्चितच असफल समजला जातो. म्हणूनच नीतिकार आचार्य भर्तृहरी म्हणतात
उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मी:।
दैवेन देयमिति कापुरुषा: वदन्ति॥
धनलक्ष्मी ही उद्योगशील पुरुषसिंहालाच प्राप्त होते. ‘देव देईल!’ अशा कल्पना भाग्यावर विसंबून असणारे भ्याड लोक करीत असतात. चौथा उपदेश आहे - ‘तरणि: इत् जयति, क्षेति पुष्यति च।’ म्हणजेच जो नौकेप्रमाणे संकटांना तरुन जातो व अडचणीवर मात करतो, तोच विजयी होतो, तो आनंदाने राहतो व सर्वदृष्टीने परिपुष्ट होतो. चहुबाजूंनी तो विकसित होतो. संकटे येतात ती मानवाचे सामर्थ्य व योग्यता वाढविण्याकरिता! म्हणून संकटांचे स्वागतच करावयास हवे. विघ्नांमुळे माणूस तितकाच सबळ बनतो, त्याची हिंमत वाढते. अडचणी या जगण्याचे कौशल्य शिकवितात. त्याची विजयाकडे वाटचाल सुरु होते. अशा अजिंक्य नररत्नांच्या विजयाचा रथ हा कोणीही रोखू शकत नाही. सर्वक्षेत्रात त्याची प्रगती होते. याच विजयाच्या बळावर तो ‘क्षेति’ स्वाभिमानाने आनंदात राहतो. तसेच ‘पुष्यति’ त्याचे जीवन सर्वदृष्टीने फलीभूत होते. त्याचा सर्वांगीण विकास होतो. असा वरील उपदेश जे जीवनात आचरतो, ते दिव्यत्त्वाला प्राप्त होतात. म्हणजेच ‘देव’ बनतात. म्हणूनच मंत्राच्या शेवटी म्हटले आहे - ‘देवा: न कवत्नवे।’ देवलोकांचे आचरण हे वाईट गोष्टींकरिता, अनिष्ट व्यवहारांकरिता कदापी नसते. हिंसक राक्षसी करण्यात नव्हे, तर अहिंसा, परोपकार, लोककल्याण करण्यात ते मग्न असतात.