मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे. आमदार रवि राणा यांनी भाजपला पाठींबा दिला आहे. राज्यात पुन्हा एकदा भाजपचेच सरकार येईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रोजच्या रोज पत्रकार परिषद घेऊन सत्तास्थापनेचा दावा करत मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असे म्हणणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही त्यांनी टोला लगावला आहे. राऊत म्हणजे शिवसेनेचा पोपट आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. सत्तेत समसमान वाटपाची अट ठेवत शिवसेनेने सत्तापेच निर्माण केला आहे. त्यामुळे भाजप आता नव्या मार्गाने सरकार स्थापन करेल, असा दावाही त्यांनी केला आहे.