उद्धव आणि ‘बेताल’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2019
Total Views |

 
पुराणात विक्रम आणि वेताळाच्या अनेक कथा आपण ऐकल्या. आज महाराष्ट्र उद्धव आणि ‘बेताल’ ची कथा पाहतोय, ऐकतोय, सोसतोय. आपली कुवत काय, आपण बोलतो काय, याचे भान ठेवण्याची अपेक्षा महाराष्ट्राने कधीही ज्यांच्याकडून केली नाही, तशी ती आजही करण्याची गरज नाही. पण, राज्यातील दोन तृतियांश शेतकरी नैसर्गिक आपत्तीने पीडित असताना आणि त्याचं दु:ख, वेदना अहंकाराच्या गर्तेत अडकत असताना महाराष्ट्रही तितकाच हवालदिल होतोय. यासाठी महाराष्ट्र शिवसेनेला कधीही माफ करणार नाही, हेही तितकंच जळजळीत वास्तव आहे. सत्ता नको, मला माझा शेतकरी महत्त्वाचा आहे, हे वाक्य आम्ही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून कित्येकदा तरी ऐकले आहे. पण, आज सत्तेच्या सारीपाटावर या उक्तीवरची कृती हरवून जाणं खरंच दुर्दैवी आहे. उद्धव ठाकरेंची राजकीय समज, त्यांची परिपक्वता, समंजसपणा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राज्याच्या विकासासाठी पोटतिडकीने काम करणार्‍या मुख्यमंत्र्यांशी असलेले त्यांचे घट्ट भावनिक ऋणानुबंध हे अवघ्या महाराष्ट्राला ठावूक असताना हा ‘बेताल’ शिवसेनेच्या छाताडावर बसल्याचे चित्र अनेकांसाठी वेदनादायी आहे.
शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपली हयात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राजवटीतून महाराष्ट्राची सुटका करण्यासाठी घालविली. हा ‘बेताल’ मात्र त्याच बाळासाहेबांच्या संपूर्ण आयुष्याचा संघर्ष धुळीस मिळविण्याच्या मागे लागला आहे. या एका ‘बेताला’च्या मागे संपूर्ण शिवसेना फरफटत जात असेल तर त्याहून दुसरे दुर्दैव कोणते म्हणता येईल? रविवारी अकोल्याच्या दौर्‍यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आम्हाला सार्‍यांना राज्याच्या भल्यासाठी काम करायचे आहे. काळजीवाहू सरकारच्या काही मर्यादा असतात, पूर्णकालीन सरकार लवकरच स्थापन होईल. या विधानामागे दडलेला अर्थ महत्त्वाचा आहे. भाजपा आज सरकार स्थापन करू शकत नाही, असे अजीबात नाही. सर्वांत मोठा पक्ष म्हणून तो कुठल्याही क्षणी दावा करू शकतो आणि शपथविधी सुद्धा लगेच होऊ शकतो. बहुमत वगैरे पुढच्या हिवाळी अधिवेशनात सिद्ध करता येईल. पण, भाजपाने तसे अजून केलेले नाही. याला एक विशिष्ट अर्थ आहे. भाजपाला जनादेशाची पूर्ण जाण आहे. मिळालेले बहुमत हे महायुतीला आहे आणि त्यातील मोठा भाऊ कोण हेही जनतेनेच त्या-त्या पक्षांच्या पारड्यात टाकलेल्या जागांनी सांगून टाकले आहे.
 
हे ‘बेताल’ रोखठोकपणे ठोकून देतात की, भाजपाला 105 जागा मिळाल्या, कारण शिवसेना सोबत होती. अन्यथा भाजपाला 70 जागा तेवढ्या मिळाल्या असत्या. उद्या भाजपाने असे म्हटले की, सेनेला 56 जागा मिळाल्या, कारण भाजपा सोबत होती, अन्यथा 20 सुद्धा मिळाल्या नसत्या, तर काय? छातीठोकपणे बोलणे आणि रोखठोकपणे लिहिण्याचे समर्थन केले तरी ‘खोटं बोल पण रेटून बोल’ याचे समर्थन करायचे तरी कसे? रोज एक अग्रलेख लिहिणं, सकाळी 9 वाजता वाहिन्यांना मुलाखती देणं आणि दिवसभर मग विशेष मुलाखती देत फिरणं किंवा बातम्या पेरणं यात आणि महाराष्ट्रासारख्या राज्याचा राज्यकारभार चालवून दाखविणं यातील अंतर समजून घेण्याची ज्यांच्यात क्षमता नाही, त्यांच्याकडून ती अपेक्षा तरी कशी करायची?
 
महाराष्ट्रात राजकीय पक्षांना जो काही जनादेश मिळाला, त्याचा अर्थ स्पष्ट आहे. हा जनादेश भाजपा आणि शिवसेना यांना एकत्र बसून राज्यकारभार करता यावा, यासाठीचा आहे. खरं तर भाजपाला बाजूला ठेवून कोणताही पक्ष सरकार स्थापन करूच शकत नाही, हे स्पष्टच आहे. अपक्षांना सुद्धा कायद्यानं पक्षांतर करता येत नाही, तर मग निवडणूकपूर्व युतीतील पक्ष निवडणुकीनंतर वेगळे कसे होऊ शकतात? आणि मुख्यमंत्रिपदासाठीचा जो आटापिटा चाललाय, तो कधीतरी शिवसेनेनं भाजपाच्या जागा कमी असताना देऊ केला काय? आता थोडं मागे वळून पाहू या. 1990 मध्ये भाजपा 42, सेना 52, 1995 मध्ये भाजपा 65, सेना 72, 1999 मध्ये भाजपा 56, सेना 69, 2004 मध्ये भाजपा 54, सेना 62, 2009 मध्ये भाजपा 46, सेना 45 असे संख्याबळ होते. या 5 पैकी एका निवडणुकीत युतीची सत्ता आली. पण, सर्वाधिक संख्याबळ शिवसेनेचे असल्याने मुख्यमंत्रिपद सेनेकडेच होते. 4 निवडणुकांमध्ये विरोधी पक्षात बसण्याचा कौल युतीला मिळाला. त्यापैकी 3 वेळा विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे होते. पहिल्यांदा 2009 मध्ये भाजपाचा एक सदस्य अधिक असल्याने विरोधी पक्षनेते पद भाजपाकडे आले. ज्यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी सुद्धा संख्याबळ पाहिले, ते आज मुख्यमंत्रिपदाबाबत कसा दावा करू शकतात?
काळजीवाहू सरकारच्या मर्यादांबाबत मुख्यमंत्र्यांच्या विधानाकडे आणखी एका अर्थाने पाहिले पाहिजे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आपली हयात ज्या राममंदिर निर्मिती आंदोलनात घालविली, तो निर्णय अगदी कुठल्याही क्षणी अपेक्षित आहे. हा निकाल काय असेल, हे जरी कुणी सांगू शकत नसले तरी तो येत असताना राज्यात स्थिर सरकार असणे ही काळाची गरज आहे. आता ‘पहले मंदिर, फिर सरकार’ हेही आम्ही उद्धवजींच्या तोंडून अनेकदा ऐकले आहे. हा निकाल येत असताना हा सत्तासंघर्ष कितपत उचित आहे? कलियुगात राजा हरिश्र्चंद्र आठवताना सुदामा पण आपल्याला आठवला पाहिजे. प्रभू श्रीरामचंद्रांचे स्मरण करताना भरत सुद्धा आपल्याला आठवले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या पुढाकाराबद्दल प्रश्र्नचिन्ह उपस्थित करून माध्यमांमध्ये फडणविसांच्या एकाकीपणाबाबत कितीही बातम्या पेरल्या, तरी त्यातून महाराष्ट्राचे निखळ मनोरंजन होण्यापलीकडे काहीही होणार नाही. अर्थात ‘विदूषक’ म्हणून आपल्याकडून हेच अपेक्षित आहे.
 
शेतकर्‍यांबाबत सर्वाधिक पुळका आणण्याचा आव शिवसेनेचाच, राममंदिरासाठी सुद्धा लढा दिल्याचा दावा शिवसेनेचाच. या अनेक प्रश्र्नांमध्ये आणखी एक प्रश्र्न महाराष्ट्राच्या मनात घोंगावतोय, तो मराठी बाण्याचा. आता याच ‘विदुषका’ला रोज सकाळ झाली की हिंदी शेरोशायरी का आठवते? अलिकडे रोज सकाळी ‘टिवटिव’ करताना केवळ हिंदीचा वापर हा मूळ मराठी बाण्याचा शिवसैनिक नसलेला नेता करतो. ‘अति तेथे माती’, ‘अति शहाणा त्याचा ‘...’ रिकामा’, ‘अंगापेक्षा बोंगा मोठा’ अशा अनेक मराठी म्हणी या महाराष्ट्राच्या तोंडावर आहेत. त्या यांना का आठवत नाही? की मराठी बाण्याचे निव्वळ सोंगच समजायचे? एका गोष्टीचे कौतुक केले पाहिजे की, कुठल्याही भाजपाच्या नेत्याने या बेताल विदुषकाला उत्तर देण्याची तसदीही घेतली नाही. कारण, त्यातून मनोरंजन होण्यापलीकडे काहीही होणार नाही. महाराष्ट्राचे हित तर कधीही साधले जाणार नाही. रविवारी उद्धव ठाकरे शेतकर्‍यांना भेटण्यासाठी बांधावर गेले, तेव्हा पत्रकारांशीही बोलले. सत्तास्थापनेबाबत त्यांना जेव्हा प्रश्र्न विचारले तेव्हा ते म्हणाले, शेतकरी संकटात असताना सरकारचा प्रश्र्न विचारणे, हे निर्गुण असल्यासारखे आहे. त्यांनी पत्रकारांना दिलेला सल्ला हा या ‘बेताल’ नेत्याला सुद्धा लागू होतो, असे आम्ही गृहित धरतो. शेतकर्‍यांना मदत देताना केवळ कागदी घोडे नाचवू नका, ही उद्धवजींनी केलेली अपेक्षा सुद्धा रास्त आहे. पण, शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी ज्या स्थिर सरकारची अपेक्षा महाराष्ट्र करतोय, त्याच्या निर्मितीत अडसर असलेल्या ‘कागदी घोड्या’चे वेसण सुद्धा घट्ट आवळण्याची गरज उद्धवजींनी लक्षात घेतली पाहिजे. संजयने दृष्टी देण्याचं काम केलं पाहिजे, पण, संजयच धृतराष्ट्र होणार असेल, तर शिवसेनेच्या भवितव्यासाठी महाराष्ट्रानं चिंतीत होणं स्वाभाविक आहे. ‘बेताल’ जर खांद्यावरून उतरला नाही, तर सिंहासन बत्तीशीच्या कथाच तेवढ्या शिल्लक राहतील. अर्थात, ज्या फांदीवर बसलो आहोत, ती कापणार्‍याला लाकुडतोड्या नाही तर ‘शेखचिल्ली’ म्हणतात, याचं भान शिवसेनेला असेलच.
@@AUTHORINFO_V1@@