मुंबई : विधानसभेचे हंगामी अध्यक्ष राज्यपालांनी नियुक्त केल्यानंतर नियमानुसार नवीन अध्यक्ष निवडणुकीने निवडून येईपर्यंत हंगामी अध्यक्ष तेच राहतात. काल नवीन सरकारने हंगामी अध्यक्ष बदलला जावा असा आग्रह केल्यामुळे कालिदास कोळंबकर यांच्या जागी दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. विधानसभेच्या नियमांप्रमाणे आधी अध्यक्ष निवड होते आणि मग विश्वासदर्शक ठराव मांडला जातो, मात्र यावेळी विश्वासदर्शक ठराव आज आणि अध्यक्षांची निवड उद्या होणार आहे. हे नवे सरकार सगळे नियम धाब्यावर बसवत आहे असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात प्रोटोकॉल पाळला गेला नाही त्यामुळे हा शपथविधी रद्द करण्यात यावा यासाठी राज्यपालांकडे याचिका दाखल केली जाणार आहे. राज्यपालांनी न्याय न दिल्यास ही याचिका सर्वोच्च न्यायालयही दाखल होऊ शकते, असेही ते यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव शनिवारी विधानसभेत मांडला जाणार असून, बहुजन विकास आघाडीचे तीन, समाजवादी पार्टी, प्रहार जनशक्तीचे प्रत्येकी दोन आणि शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे प्रत्येकी एक आमदार आणि सात अपक्ष आमदार सरकारच्या पाठिशी आहेत.