अकोला : राज्यात सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या संघर्षावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी हा पेच लवकरच सुटेल, असे सुतोवाच केले. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारस्थापनेचा पेच लवकरच सुटणार असल्याचे संकेत दिल्याने राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, “सरकारस्थापनेचा पेच लवकरच सुटेल असे मला वाटते, शेवटी सर्वांना महाराष्ट्राच्या हितासाठी काम करायचे आहे. महाराष्ट्रात सध्या शेतकर्यांवर मोठे संकट आहे. या संकटाच्या काळात नवीन सरकार लवकरात लवकर स्थापन झाले पाहिजे. कारण, काळजीवाहू सरकारला निर्णय घेण्यासाठी काही बंधने असतात, सध्या जे निर्णय घेता येतील ते तर काळजीवाहू सरकार घेतच आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे हित पाहता लवकरात लवकर सरकारची स्थापना होईल, अशी मला अपेक्षा आहे.”
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाबाबत बोलताना ते म्हणाले, “परतीच्या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने राज्यावर मोठे संकट ओढवले आहे. अशा स्थितीत शेतकर्यांना सर्व मदत करण्यात येत आहे. ओल्या दुष्काळाची स्थिती आहे. पण शेतकर्यांनी चिंता करू नये. त्यांना सर्व मदत केली जाईल,” अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.