मुंबई : महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी पार पडल्यानंतर त्यांनी विधिमंडळात न जात थेट 'सह्याद्री'वर बैठक बोलावली. या बैठकीत पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपुन-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
फडणवीस म्हणाले, "जर या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का?, नियमबाह्य पद्धतीने प्रो-टेम अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी? , स्वतच्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का? , अजूनही त्यांना डांबून ठेवण्याची शिक्षा का?, भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाविकास आघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवा-छपवी आणि भीती का? , महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे!"
फडणवीस यांनी महाविकास आघाडीची बैठक पार पडल्यानंतर त्यावरही टीका केली होती. 'महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे. नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या!', असा टोलाही त्यांनी लगावला होता.