ठाण्यातून बिबट्याच्या कातडीची तस्करी उघड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2019
Total Views |



 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या येऊर परिक्षेत्रातील वनधिकाऱ्यांनी मंगळवारी ठाण्यामधून बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोन इसमांच्या मुसक्या आवळल्या आहेत. हे इसम सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून ठाण्यात बिबट्याच्या कातडी विकण्यास आले होते. 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
 
 

 
 
 
 

ठाण्यातील येऊर वनपरिक्षेत्राातील अधिकाऱ्यांनी वन्यजीव तस्करीसंदर्भात विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत वन्यजीव तस्करांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी अशाच दोन तस्करांना वनाधिकाऱ्यांनी पकडले. सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्यामधून दोन इसम ठाण्यात बिबट्याची कातडी विकण्यास येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. उपवन परिसरातील भू केंद्र बस स्टाॅप किंवा उपवन तलावाजवळ हे इसम येणार होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी वनाधिकाऱ्यांच्या साध्या गणवेशातील दोन पथकांची त्याठिकाणी नेमणूक करण्यात आली. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास भू केंद्र बस स्टाॅपजवळ आलेल्या दोन इसमांकडे काळ्या रंगाच्या बॅग आढळल्या. शिवाय त्यांच्या हालचालीही संशयास्पद वाटल्याने वन अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या बॅगांची तपासणी केली असता त्यांमध्ये पाॅलिथीनच्या पिशवीत बिबट्याचे कातडे आढळून आले.

 
 
 

या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या नरेंद्र गुरव (वय ३९) आणि अजित मराठे (वय ३३) या इसमांनी वैभववाडी येथून बिबट्याची कातडी विकण्याच्या हेतूने ठाण्यात आणल्याची कबुली दिल्याची माहिती येऊर परिक्षेत्राचे वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी दिली. ही कातडी वैभववाडी येथून एका व्यक्तींकडून घेतली असून त्याने बिबट्याची शिकारी केल्याची माहिती त्यांनी वनाधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान दिली. बिबट्याची शिकार करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एका पथकाला वैभववाडीला पाठवल्याचे पवार यांनी सांगितले. तर हे कृत्य केल्याने वन्यजीव संरक्षण कायद्याचा भंग झाला आहे. त्यामुळे या इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे, ते म्हणाले.

 
  

या प्रकरणाचा सखोल तपास राष्ट्रीय उद्यानाचे सहाय्यक वनसंरक्षक डी.एम.दहिबावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ही कारवाई पूर्ण करण्यामध्ये राजेंद्र पवार यांच्यासोबत परिमंडळ वन अधिकारी सुजय कोळी, विकास कदम, रमांकात मोर, वनरक्षक संजय साबळे, राजन खरात, सुशिल राॅय, प्रमोद कदम, राकेश शेलार, दिनेश पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

@@AUTHORINFO_V1@@