नवी दिल्ली : तिरुपती विमानतळावर व्हीआयपी पाहुण्यांसाठी अतिथी संकुल बांधण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाची १८०० चौरस मीटर जमीन देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) ‘आंध्र प्रदेश एज्युकेशन अँड वेलफेयर इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन’ला (एपीडब्ल्यूआयडीसी) १८००चौरस मीटर जागा केवळ १ रुपया परवाना फी आकारात १५ वर्षांसाठी प्रदान केली. ही जमीन तिरुपती विमानतळावर अतिथी संकुल (सेरेमोनियल लाऊंज) तयार करण्यासाठी वापरली जाईल.
सरकारी प्रसिध्दीपत्रकानुसार, ‘तिरुपती’ हे भगवान श्रीवेंकटेश्वराशी संबंधित ठिकाण आहे. जिथे व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी लोक सहसा भेट देतात. तेथे अशा अतिथी संकुलाच्या बांधकामामुळे दर्शनासाठी येणाऱ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. याची देखभाल एपीडब्ल्यूआयडीसी अंतर्गत होईल.
स्पेनमध्ये होणाऱ्या ‘जागतिक हवामान बदल परिषदे’बाबत भारताच्या भूमिकेला मान्यता
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी स्पेनमध्ये पुढील आठवड्यात होणाऱ्या ‘संयुक्त राष्ट्रा’च्या ‘हवामान परिवर्तन परिषदे’बाबतच्या भारताच्या भूमिकेस बुधवारी मान्यता दिली. स्पेनच्या माद्रिद येथे २ ते१३ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदलाच्या ‘फ्रेमवर्क’ परिषदेत झालेल्या २५व्या परिषदेत (सीओपी) वाटाघाटींबाबतच्या भारताच्या भूमिकेस मान्यता देण्यात आली. ‘चिली’ देशाच्या अध्यक्षतेखाली ही परिषद आयोजित केली जात आहे. या परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर करणार आहेत.
भारत आणि म्यानमारने मानवी तस्करी रोखण्यासाठी सामंजस्य करारास मान्यता दिली
मानव तस्करी रोखण्यासाठी भारत आणि म्यानमार यांच्यात द्विपक्षीय सहकार्याबाबत मंत्रिमंडळाने सामंजस्य करार (एमओयू )ला मान्यता दिली. मानवी तस्करी रोखण्यासाठी, पीडितांना वाचवण्यासाठी आणि त्यांना परत पाठवण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याबाबत भारत आणि म्यानमार यांच्यात झालेल्या सामंजस्य करारांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली.