मुंबई : तळागाळातील युवकांना विनाशुल्क नोकरीची संधी उपलब्ध करून देत सामाजिक कार्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या 'नयालक्ष्य मॅनेजमेंट कन्सल्टंट'च्या (एलएलपी) संचालिका नयना नाईक यांना मंगळवारी 'तेजस्विता' पुरस्काराने गौरविण्यात आले.
'स्वावलंबन फाऊंडेशन'च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दादर पश्चिम येथील शिवाजी पार्क, वनीता समाजाच्या सभागृहात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स' (एमएसीसीआयए) आणि हरहायनेस्टच्या संस्थापक प्रज्ञा पोंक्षे यांच्या हस्ते हा पुरस्कार नयना नाईक यांना देण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. नयना नाईक या 'नयालक्ष्य मॅनेजमेंट कन्सल्टंट'च्या (एलएलपी) संचालकपदी कार्यरत असून तळागाळातील युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात त्यांनी मोलाचे कार्य केले आहे.
यासोबतच नवीन उद्योजकांना त्यांच्या व्यवसाय उभारणीसाठी प्रशिक्षण देण्याचे काम त्या करत असून त्यांच्या याच सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना 'स्वावलंबन फाऊंडेशन'च्यावतीने 'तेजस्विता' पुरस्काराने गौरविण्यात आले. नयना या उच्चशिक्षित आहेत. त्यांनी व्यवस्थापन (मॅनेजमेंट) क्षेत्रात 'पीजीडीएम (एमबीए-एचआर)' ही पदवी संपादन केली असून कामगार कायद्याचेही प्रशिक्षण घेतले आहे. यासोबतच 'ग्रॅफोलॉजिस्ट', एनएलपी (न्युरो लिंग्विस्टिक प्रोग्राम), प्रॅक्टिश्नर आदींचेही प्रशिक्षण घेतले आहे. आपल्या आयुष्यात २३ वर्ष नोकरी केल्यानंतर लघुउद्योगांसाठी गेली सहा वर्ष त्या 'एचआर बिझनेस कन्सल्टिंग'चा व्यवसाय करत आहे.
"भविष्यात, लघुउद्योजक आणि 'एचआर' क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या नवतरुणांच्या समन्वयाने 'एचआर रिसर्च सेंटर' उभारण्याचे स्वप्न आहे.आतापर्यंत मिळालेले ज्ञान आणि अनुभव लोकोपयोगी कसे ठरेल, या शोधाअंती स्वावलंबन सापडले. याबद्दल मी परमेश्वराची खूप खूप ॠणी आहे."
- नयना नाईक, संचालक,
नयालक्ष्य मॅनेजमेंट कन्सल्टंट