मुंबई : शिवसेना आमदारांना आता हॉटेल ललितवरून 'लेमन ट्री' येथे हलवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय नाट्याला सोमवारीही नवे रंग दिसले. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तापेचाच्या निकाल राखून ठेवल्यानंतर शिवसेनेने आपल्या आमदारांवर पहारा आणखी वाढवला आहे. हॉटेल ललित येथून त्यांना मुंबई विमानतळानजीकच्या हॉटेलात हलवण्यात आले आहे. त्यांच्यावर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचा जागता पाहारा दिवसरात्र सुरू आहे. आपले आमदार फुटू नयेत म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी विशेष काळजी घेत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही सांताक्रूझ येथील हॉटेल ग्रँण्ड हयात येथे रविवारी हलवण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर पक्षातर्फे जितेंद्र आव्हाड यांच्यासह बड्या नेत्यांनी 'वॉच' ठेवला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यातर्फे पोलीसांवर वारंवार आरोप केला जात आहे. पोलीस साध्या वेशात आमच्या आमदारांवर लक्ष ठेवून आहेत, असा आरोप आव्हाडांनी केला आहे. भाजपने मात्र, आमचा आमच्या आमदारांवर पूर्ण विश्वास असून त्यांना डांबून ठेवण्याची गरज नसल्याची प्रतिक्रीया या साऱ्या प्रकरणावर प्रतिक्रीया देताना दिली आहे.