मुंबई : अजित पवारांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीने छगन भुजबळ यांना पाठवलं. अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली आहे. दीड तासाच्या चर्चेनंतर छगन भुजबळ बाहेर पडताना घर तुटायला नको असं त्यांनी म्हटलं. तर या भेटीनंतर उपमुख्यमंत्रीपदाची सूत्र स्वीकारण्यासाठी अजित पवार तडक मंत्रालयाकडे रवाना झाल्यामुळे राष्ट्रवादीचा हा प्रयत्न ही वाया गेला आहे.
महाविकासआघाडीचं सरकार राज्यात येणार असं वाटत असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केल्यानं सत्तास्थापनेच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या घटनेनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांनी दिलेल्या धक्क्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा पक्षाला सावरण्यासाठी सरसावले असून, काही आमदार राष्ट्रवादीकडे परतवण्यात ते यशस्वी झाले आहेत.या प्रकरणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. त्याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.