कोलकाता : भारत विरुद्ध बांग्लादेश या संघांमध्ये झालेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात बांग्लादेशचा एक डाव आणि ४६ धावांनी पराभव करत इतिहास रचला आहे. दिवस-रात्र सामन्यात खेळवण्यात आलेल्या पहिल्याच कसोटी सामन्यात भारताने विजय आपल्या नावावर केला आहे.
भारताने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकते २-० ने धूळ चारली आहे. उमेश यादव पाच आणि इशांत शर्माने चार गडी बाद केले. बांग्लादेशकडून मुश्फिकुर रहीमने ७४ धावा केल्या. भारतीय संघाने आपला पहिला डाव ९ बाद ३४७ धावांवर घोषित केला होता. बांग्लादेशचा संघ पहिला डाव १०६ आणि दुसरा डाव १९५ धावांवर आटोपला. यापूर्वी भारताने पहिल्या कसोटी सामन्यात बांग्लादेशचा एक डाव आणि १३० धावांनी पराभव केला.
इशांत शर्माने सामन्यात ९ गडी बाद केले. त्याने बांग्लादेशच्या दुसऱ्या डावात शादमान इस्लाम (०), इमरुल कायेस (५), मोमिनुल हक (०) आणि मेहदी हसन (१५) यांना तंबूत पाठवले. दुखापतीमुळे महमूदुल्ला ३९ धावा करून रिटायर्ड हर्ट झाला. तर बांग्लादेशसाठी अल अमीन हुसैन आणि इबादत हुसैन यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. तर अबु जायेदला एक बळी मिळवता आला. भारतीय कर्णधार विराट कोहलीने १३६ धावा करत कसोटी कारकिर्दीतील २७ वे आणि डे-नाइट कसोटी सामन्यातील पहिले शतक झळकावले.