मुंबई : राज्यात भाजपच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतरही 'महाविकासआघाडी'तील नेते सत्ता स्थापनेच्या दाव्यावर कायम आहेत. सकाळपासूनच सर्व नेत्यांनी आपापल्या नेत्यांना आश्वस्त करत सरकार आपलेच येणार असल्याचा विश्वास दिला. कुठलीही परिस्थिती आली तरीही आम्ही एकत्रच राहू असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार रविवारीही दिवसभर महाविकासआघाडीतील नेत्यांच्या बैठका सुरूच होत्या.
सकाळी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पवईतील रेनेंसो हॉटेल येथे राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीला सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना यावेळी संबोधित केले. सरकार आपलेच येईल, असा विश्वास त्यांनी आमदारांना दिला. त्यांच्यासोबत खासदार संजय राऊतही उपस्थित होते. यानंतर उद्धव ठाकरे मालाड येथील हॉटेल ललित येथे निघून गेले. त्यापूर्वी त्यांनी सकाळी काँग्रेस आमदारांचीही हॉटेल जे.डब्ल्यू मेरियेट येथे भेट घेतली.