मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या शेवटच्या अंकात साऱ्यांनाच चक्रावून सोडत भाजपने बाजी मारली आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तेच्या डावपेचांत भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेला चितपट करत राज्याने दिलेला कौल मान्य केला आहे. यासोबतच गेल्या काही दिवसांपासून लागू झालेली राष्ट्रपती राजवटही मागे घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शुक्रवारपासूनच राजभवनावर हालचाली वेगाने वाढत होत्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील एका गटाने भाजपला समर्थन दिल्याने राज्याला पुन्हा एकदा भाजपप्रणित स्थिर सरकार मिळाले. शनिवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावर जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला आणि शपथविधीचा कार्यक्रमही पार पडला. त्यासोबतच अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
दरम्यान, शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांचे आभार मानले. महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला कौल दिला होत्या त्या मताचा आदर करत आम्ही पुन्हा सरकार स्थापन केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर अजित पवार यांनी तीन पक्षांपेक्षा बहुमत असलेल्या पक्षाचे सरकार जास्त योग्य असल्याचे मत व्यक्त केले.