मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीची आजची बैठक संपली असून, या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय घेण्यात आले याबाबत जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. 'काँग्रेस-राष्ट्रवादीची आजची बैठक संपली असून सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. उद्या आम्ही आघाडीतील मित्रपक्षांशी चर्चा करू. त्यानंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करूनच महाआघाडीची अंतिम घोषणा करू आणि राज्यपालांना भेटू,' असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत राज्यात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडीचे नवे सरकार स्थापन होण्याची चिन्हे दिसत आहे. या बैठकीबद्दल सांगताना, सरकार स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची सर्व मुद्द्यांवर एकवाक्यता झाली असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.