नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तापेचावर चर्चा सुरू आहे, राज्याला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येऊन राज्याला स्थिर सरकार देणार असल्याचे मोठे विधान कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. त्यांच्यासोबत पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक उपस्थित होते. दोघांनीही चर्चेदरम्यान पत्रकार परिषद घेतल्यानंतर ही माहिती दिली. गेल्या काही दिवसांत पहिल्यांदाच आघाडीच्या नेत्यांनी अशी घोषणा केल्याने राज्यात महाशिवआघाडीच्या पर्यायी सरकार स्थापनेबद्दल पुष्टी झाली आहे.
नवी दिल्लीतील जनपथ येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीदरम्यानच त्यांनी पत्रकार परिषद घेतले. राज्याला सध्या एका स्थिर सरकारची गरज आहे. शेतकऱ्यांना सरकार नसल्याने मदत मिळणे कठीण होत आहे, त्यामुळे आम्ही राज्याला लवकरच स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करू, असे नवाब मलिक म्हणाले.