नवी दिल्ली : सियाचीनमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांवर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे. हिमस्खलन होऊन कडा कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अडकून ४ जवानांसह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. सियाचीनमधील कारकोरम भागात हिमस्खलन झाले आहे. या भागात आधीच अत्यंत प्रतिकूल स्थितीत जवानांना पहारा द्यावा लागतो.
सियाचीन हे समुद्रसपाटीपासून १८ हजार फूट उंचीवर आहे. अचानक हिमस्खलन झाल्याने डोग्रा रेजिमेंटचे ६ जवान आणि २ हमाल बर्फाच्या ढिगाऱ्याखाली सापडले. यामध्ये ४ जवानांचा तर २ हमालांचा मृत्यू झाला. सैनिकांनी घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरु केले आहे. सियाचीनमध्ये शत्रूपेक्षा वातावरणाची जास्त भीती असते. दरम्यान, हिवाळा सुरू झाल्यानंतर कारकोरम भागातील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होतो. हिवाळ्यात हिमस्खलनाचे जास्त प्रकार घडतात.