मायावतींच्या बहुजन समाज पक्षाचे पदाधिकारी उत्तर प्रदेशातील ब्राह्मण सवर्णबहुल गावांमध्ये जातील. तिथल्या ब्राह्मणांचे पाद्यपूजन करतील. त्यांचे आशीर्वाद घेऊन ब्राह्मणांना सामाजिक एकतेचे अर्थात राजकारणातल्या ‘सोशल इंजिनिअरिंग’चे तत्त्व समजावतील. बसपच्या या आंदोलनाचे नाव आहे ‘पैर छुओ अभियान.’ त्यासाठी बसपने एक वेगळे दलही तयार केले, असे वाचनात आले. बसपचे राष्ट्रीय महासचिव सतीश मिश्र यांचे म्हणे ‘आदेश’ आहेत. अर्थात, बसपमध्येही पक्षाध्यक्षा बहन मायावती यांना विचारल्याशिवाय पानही हलत नाही, हे नक्कीच. देशात जातीभेद आहे, हे खरे आहे. असे जरी असले तरी सगळेच सवर्ण किंवा सरळसरळ ब्राह्मण व्यक्तीसमोरच्या व्यक्तीने माझी पूजा करावी आणि मग मी त्याला आशीर्वाद किंवा शाप देईन, या भूमिकेत नाही. जातीअंताची लढाई लढणारे अनेक शेवटी जातीयतेचे मसिहा होतात हेच खरे. त्यामुळेच महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांना जिंकण्यासाठी जातीपातीचे गट पाडून उमेदवार निवडावे लागले. जात वर्गीकरणाला त्यांनी ‘अलुतेदार-बलुतेदार’ शब्दांची खमंग फोडणीही दिली, तर तिथे उत्तर प्रदेशातही जातीचा जोर लोकांमध्ये नसला तरी नेत्यांच्या रक्तात भिनलेला! त्यामुळेच यादव-मुस्लिमांची जोडी बनूवन सप कायम ‘सायकल’ हाकत असते आणि लालूंच्या राजदची ‘लालटेन’ही याच बळावर टिमटिमते. बसपचा ‘हत्ती’ वर्णव्यवस्थेच्या चार पायांत अजूनही गुरफटलेला. ब्राह्मण असो की मागासवर्गीय, प्रत्येक व्यक्तीला मनापासून सन्मान दिला, तिला विकासाच्या आणि माणूसपण जगण्याच्या संधी दिल्या तर ती व्यक्ती कधीही तुमच्यापासून दूर जाणार नाही, हे नक्की. पण, सच्च्या मानवतावादाचा पाया नसल्याने सप- बसप-राजदसारखे राजकीय पक्ष हा भाव समजू शकत नाही. हा भाव पंतप्रधान मोदींनी जाणला. त्यांनी स्वच्छताकर्मींचे पाद्यपूजन केले. त्यात इतिहासाला कलाटणी द्यायची साक्ष होती. त्याचीच ‘कॉपी’ बसपने करायचे ठरवले आहे. पण ही ‘कॉपी’ एकदम उलटी. इथे मनाचा, श्रद्धेचा भाव नाही. तर, ‘आम्ही तुमचे पाय पुजतो, तुम्ही आम्हाला मत द्या’ची ही लबाडी आहे. जातीवरून माणसाची पूजा करण्याची ही संस्कृती बसप आता गावोगावी जागवणार. वा! जातीअंतापासून जातीपूजेचा हा बसपचा प्रवास केविलवाणा आहे.
तडप तडप के इस दिल से...
शहाण्या माणसाला ठेच लागली तर तो सावध होतो. इथे लिलावतीमध्ये ब्लॉकेजची पाळी आली तरी यांचे ये ‘दिल माँगे मोर’चा ड्रामा सुरू आहे. त्यासाठी यांनी ‘ये दिल तुम बिन लगता नही’ म्हणत त्यांच्या मागेपुढे करण्यास सुरुवात केली. मात्र, ‘१७०’ची जपमाळ करणार्यांना ‘घड्याळा’ने लगेच ‘दिल विल प्यार वार मै क्या जानू रे?’ म्हणत सत्तास्थापनेचा घोळ कायम ठेवला. तरीसुद्धा यांनी ‘बत्तमिज दिल, बत्तमिज दिल माने ना,’ म्हणत ‘धनुष्यबाणा’चा निशाणा ‘घड्याळा’कडेच ठेवला. यांच्या दिलाचे पार तुकडे झाले पण, तिथून काही संकेत मिळाले नाहीत. गोड गोड हसत, बोलत ‘घड्याळ’ यांच्या दिलाला झुलवत राहिले. यांच्या शुभचिंतकांनी यांना समजावले, इशारे दिले. पण, ‘दिल आया गधी पर तो परी क्या चिज है’ हे यांच्याबाबत १०० टक्के खरे झाले. त्यामुळेच तीन दशकांच्या आपल्या मित्राची साथ त्यांनी सोडली. त्यामुळे समोरच्या ‘घड्याळा’ची ‘हाता’च्या पंजासकट दिलजमाई सुरू झाली. हे दोघे ’है अपना दिल तो आवारा, न जाने किसपे आयेगा’ म्हणत यांना दररोज उद्याची तारीख देत राहिले. त्यांच्या ‘तारीख पे तारीख’ वर हेसुद्धा आपले ‘दिल वारी जावा’ करत मजनू झाले आहेत. ते म्हणतात, त्यांना समजण्यासाठी १०० जन्म घ्यावे लागतील. यावर काय म्हणावे? यांना ते समजता येत नाहीत. याचा अर्थ दुसरे त्यांना समजू शकत नाही, असे थोडेच आहेत. ‘कमळ’ आणि ‘पंज्याने’ही त्यांना चांगलेच समजून घेतले आहे. असो, ते दररोज यांना नादी लावतात आणि हे दररोज खुळावतात. एक प्रसिद्ध भावगीत आहे ‘नाच नाचुनी अति मी थकले, थकले रे नंदलाला.’ पण यांच्या बाबतीत ‘बोल बोलूनी अति मी थकलो, थकलो रे ’.. जाऊ दे ते नंदलाला बोलणार नाहीत. कारण, ‘थकलो’ हे सांगण्यासाठी त्यांना ‘मातोश्री’, ‘सिल्वर ओक’, ‘दिल्ली’ वगैरेला वार्या कराव्या लागतील. मात्र, काहीही असो यांचा,‘दिल से दिल्लीतक’ चा सफर महाराष्ट्र विसरणार नाही. असो, काही दिवसांतच महाराष्ट्र यांना विचारणार आहे ‘दिल तेरा किसने तोडा? यूँ तनहा किसने छोडा? आणि हे म्हणतील ’तडप तडप के इस दिल से आह निकलती रही...’