शांतता... योग्य वेळ येणार आहे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2019   
Total Views |





आपण शांत राहावे. योग्य वेळेची वाट बघत बसावे. उपरण्याच्या गाठीला बांधून ठेवण्याची परिस्थिती आपल्या गतीने लवकरच येईल. तोपर्यंत प्रतीक्षा करावी.



शिवसेना नेते संजय राऊत गेले अनेक दिवस युती आणि भाजपसंबंधी वाट्टेल ते बडबडत असतात. माझा मित्र मला म्हणाला, “रमेश, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे या दोघांना झोडणारा एक चांगला सणसणीत लेख लिही, त्याची गरज आहे.” मी त्याला म्हणालो, “अरे ही राजकीय लढाई चालू आहे, उत्तरे द्यायची असतील तर, ती भाजपने दिली पाहिजेत. हे काम मी माझ्या अंगावर घेणे बरोबर नाही.” मात्र, त्याला माझे म्हणणे काही पटले नाही.

 

याच विषयावर संवाद चालू असताना मी त्याला एक गोष्ट सांगितली - एक घोडा आणि एक गाढव यांच्यात पैज लागली की, दोघांत मोठा कोण? मी का तू? मोठेपणा ठरविण्यासाठी त्यांनी स्पर्धा सुरू केली. प्रथम धावण्याची स्पर्धा झाली. घोड्यापुढे गाढव कसा टिकणार? तो हरला. नंतर शक्तीची परीक्षा झाली. एक घोडा टांगा खेचतो, गाढवाला एक गाडीदेखील खेचता येत नाही. त्यातही तो हरला. अशा विविध कसोट्यांमध्ये हरूनही गाढवाने ‘मी हरलो,’ असे म्हणण्याचे नाकारले. शेवटी ते एक उकिरड्यावर गेले, वर पाय करून तो लोळू लागले. ते घोड्याला म्हणाले, “बघ मी हे करतो आहे, तू करू शकतोस का?” घोडा म्हणाला, “नाही बाबा, मी हरलो. तू जिंकलास.” संजय राऊतच्या तोंडी लागणं म्हणजे, घोडा आणि गाढवाची गोष्ट जगण्यासारखे आहे. भाजपने ठरविले आहे की, आपल्याला काही उकिरड्यावर लोळायचे नाही.

 

वल्गना करण्यालाही काही सीमा असते. ‘आमच्याकडे १७५ आमदार आहेत’, ‘आम्ही २५ वर्षे सत्तेवर राहाणार आहोत’, ‘भाजपच्या नाशाची सुरुवात महाराष्ट्रातून होईल’, ही सर्व बढाईखोड भाषा झाली. अशा बढाईखोर भाषणांबद्दल अब्राहम लिंकन काही गोष्टी सांगत असत. त्यातील पहिली गोष्ट अशी की, एका गावात कोतवालपदाची निवडणूक होती. दोघांमध्ये जास्त चुरस होती. प्रत्येकाला विजयाचा विश्वास होता. एक उमेदवार आपल्या बायकोला म्हणाला, “निवडणूक मीच जिंकणार! मीच कोतवाल होणार, माझ्याशी स्पर्धा करण्याची कोणाची ताकद नाही. मीच सर्वांत ताकदवान आहे.” वगैरे... निवडणुकीच्या आदल्या रात्री तो आपल्या बायकोला म्हणाला, “बघ, उद्या तू कोतवालाच्या बिछान्यात झोपशील.” हे वाक्य त्याने अनेकवेळा उच्चारले.

 

दुसर्‍या दिवशी निवडणूक निकाल जाहीर झाला. हा बढाईखोर कोतवाल सणकून आपटला. संध्याकाळ झाली. बायकोने उत्तम कपडे केले आणि ती जाण्यास निघाली. कोतवालाने विचारले, “तू कुठे चाललीस?” ती म्हणाली, “कोतवालाच्या बिछान्यात झोपायला.” लिंकनला हे सांगायचे आहे की, ‘आपली कुवत ओळखून बढाया माराव्यात आणि काहीही वक्तव्ये केलीत तर या कोतवालासारखी अवस्था होते.’

 

लिंकनने अशीच एक दुसरी गोष्ट सांगितली आहे. त्याच्या सेनापतीचे नाव होते, मॅक्लिकन. सैन्याची कवायत घेण्यात तो पटाईत होता. रणांगणावर जाऊन लढायला त्याची हिंमत होत नसे. सैन्याला शिस्त लावणे आणि सदैव तयार ठेवणे हे काम तो चांगले करी. लढाई त्याला जिंकता येत नसे. त्याविषयी लिंकन म्हणाला - माझ्या गावी एकाने झुंज खेळणारे कोंबडे पाळले होते. त्यातला एक कोंबडा चांगला तगडा झाला होता. तेव्हा लोकांच्या करमणुकीसाठी प्राण्यांच्या झुंजी लावल्या जात. चित्रपटाचा जमाना सुरू व्हायचा होता.

 

एके दिवशी या शेतकर्‍याचा कोंबडा आणि दुसर्‍या शेतकर्‍याचा कोंबडा यांच्यात झुंजीचा कार्यक्रम ठरला. दोघेही आपापले कोंबडे घेऊन आले. रिंगणात दोन्ही कोंबडे आले. दुसर्‍या शेतकर्‍याच्या कोंबड्याने पहिल्या कोंबड्यावर हल्ला केला. तो जरी तगडा असला तरी त्यात लढाईची हिंमत नव्हती. तो बाजूला झाला आणि रिंगणातच पळू लागला. लोकं हसायला लागले. टाळ्या पिटू लागले. त्या कोंबड्याचा मालक शेतकरी दु:खी झाला आणि रागावला. त्याने आपल्या कोंबड्याला हातात घेतले आणि आकाशात भिरकावून दिले. तो म्हणाला, “तू फक्त खुराड्यातच शोभेचा कोंबडा आहे. तिथेच तू वटवट करीत राहा. रणमैदानात तुझा काही उपयोग नाही.” राजकारणाचा विषय केला, तर राजकारणाचे रणमैदान निवडणूक असते. ‘मातोश्री’ ते कॅमेर्‍यात बढाया मारण्यात कोणाचे काय जाते? रणांगणातच खरी परीक्षा होणार आहे.

 

जे फार वाचाळ असतात, जीभ सैल सोडून काहीही बोलत असतात, त्यांच्या नादी शहाण्या माणसाने लागू नये. त्यांना बोलू द्यावे. आपण ऐकण्याचे काम करावे. शब्द काही अंगाला येऊन चिकटत नाहीत आणि मनाला ते लावून घ्यायचे नाही, असं ठरवलं तर त्या शब्दांचा काहीही उपयोग नसतो. भगवान गौतम बुद्धांकडे एक माणूस आला, बुद्धाच्या शिकवणुकीमुळे त्याचा लोकांना ठगवण्याचा धंदा बंद होत चालला होता. सामान्य माणसांना इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून भुलविता येते. धार्मिक विधी करण्यास त्यांना भाग पाडता येते. भगवान बौद्धांच्या शिकवणुकीमुळे हे सर्व बंद होत चालले होते.

 

तो गौतम बुद्धांना खूप शिव्या देऊ लागला. तुम्ही खोटारडे आहात, बिनकामाचे आहात, फसवणूक करता, शब्द पाळत नाहीत वगैरे वगैरे. याला शिव्यांची फोडणी त्याने दिली. भगवान बुद्धांनी सर्व शांतपणे ऐकून घेतले. नंतर ते त्याला म्हणाले, “तुझे बोलून झाले का? आता मी प्रश्न विचारू का?” तो म्हणाला, “विचारा.” भगवान म्हणाले, “तुझ्या घरी पाहुणे येत असतील. ते आल्यानंतर त्यांना तू काही भेट देत असशील.” तो म्हणाला, “हो, हे सर्व मी करतो, हे गृहस्थाश्रमाचे कर्तव्य आहे.” “समज, त्यातील काही जणांनी तुझी भेट स्वीकारली नाही, तर ती भेट कोणाकडे राहील?” असा प्रश्न भगवंतांनी विचारला. तो म्हणतो, “अर्थात माझ्याकडेच राहील.” तेव्हा भगवान म्हणाले, “तू मला जे अपशब्द वापरलेस ते मी स्वीकारलेले नाहीत, मग ते कोणाकडे राहाणार?” तो काय बोलणार, त्याची वाचाच बंद झाली.

 

म्हणून बेताल बडबड करणारे जे असतात, त्यांना आपण ‘बोलबच्चन’ म्हणतो. बोलत राहणं हेच त्यांचे काम आहे. तोच त्यांचा रोजीरोटीचा व्यवसायसुद्धा आहे. म्हणून आपण शांत राहिलं पाहिजे. उत्तेजित होता नये. उत्तेजित झाले असता, शिवीगाळ करणारा माणूस अधिक मोठा होतो. आपल्याला त्यांना मोठं करायचं नाही. एकदा भगवान श्रीकृष्ण, सात्यकी आणि बलराम प्रवासाला चालले होते. रात्र झाल्यावर एका झाडाखाली ते विश्रांतीसाठी थांबले. आळीपाळीने एकाने पहारा द्यावा, असे ठरले. प्रथम पाळी बलरामाची आली. थोड्यावेळाने तेथे एक ब्रह्मराक्षस आला. तो म्हणाला, “मी आता तुम्हाला खातो.” बलराम संतापला. त्यांचे भांडण सुरू झाले आणि ब्रह्मराक्षस मोठा मोठा मोठा होत गेला. तो बलरामाच्या हाती काही लागला नाही. बलराम थकला, पहारा करण्याची त्याची वेळही संपली. त्याने सात्यकीला उठवले. नंतर ब्रह्मराक्षस सात्यकीपुढे आला. दोघांचे भांडण आणि मारामारी सुरू झाली. ब्रह्मराक्षस आकाराने वाढत वाढत गेला. सात्यकीही थकला. त्याने कृष्णाला उठवले.

 

कृष्ण त्या ब्रह्मराक्षसाला म्हणाला, “तुझ्या खाण्या-पिण्याच्या गोष्टी नंतर करू. प्रथम बस आपण गप्पा मारू.” असं म्हणत त्याने त्याच्याशी गप्पा करण्यास सुरुवात केली. इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून त्याला हसविले. तसतसा तो लहान लहान होत गेला. शेवटी इतका लहान झाला की, कृष्णाने त्याला धरले आणि आपल्या उपरण्याला गाठ मारून बांधून ठेवले. पहाट झाली. सगळे उठले. दोघांनी कृष्णाला विचारले, “त्या ब्रह्मराक्षसाचे तू काय केलेस?” कृष्ण हसून म्हणाला, “मी त्याला उपरण्याला बांधून ठेवले आहे.” प. पू. श्रीगुरुजी ही कथा सांगत असत. त्याचा अर्थ असा की, अनावश्यक कोणाच्या तोंडी लागू नये. त्यामुळे त्याचे प्रस्थ वाढते आणि तो आहे त्यापेक्षा मोठा होत जातो. आपण शांत राहावे. योग्य वेळेची वाट बघत बसावे. उपरण्याच्या गाठीला बांधून ठेवण्याची परिस्थिती आपल्या गतीने लवकरच येईल. तोपर्यंत प्रतीक्षा करावी.

@@AUTHORINFO_V1@@