नवी दिल्ली : राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसून नेमके कुणाचे सरकार येणार याबाबत अद्याप संभ्रम आहे, यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस संदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तूळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राज्यसभेतील भूमिकेबद्दल कौतूक करताना पंतप्रधानांनी या पक्षाकडून शिकण्यासारखे आहे, असे म्हटले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने वेळोवेळी घेतलेल्या भूमिकांबद्दलही त्यांनी कौतूक केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदारांनी सभागृहात 'वेल'मध्ये न येण्याबद्दलच्या भूमिकेचेही त्यांनी कौतूक केले. अशातच राज्यातील महाशिवआघाडीच्या वर्तूळात वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. शिवसेनेची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कौतूक होत, असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. एकीकडे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी किमान समान कार्यक्रम ठरल्याचे जाहीर केले आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र, सत्तास्थापनेबद्दल शिवसेनेलाच विचारा असे सोमवारी दिल्लीत म्हटले.