नवी दिल्ली : राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून जोरबैठका सुरू असताना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी नवीनच माहिती दिली आहे. राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी आपण भाजपाध्यक्ष अमित शाह यांना लक्ष घालण्याची विनंती केली. त्यावर, “काळजी करू नका. भाजप-शिवसेना राज्यात सरकार स्थापन करेल,” असे आपल्याला अमित शाह यांनी सांगितल्याचा दावा आठवले यांनी केला आहे.