वर्षभरापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा भारताचा सलामीवीर मयांक अग्रवाल याने आज बांग्लादेश विरुद्ध भारत कसोटी सामन्यात धमाकेदार शतक ठोकले. कसोटी कारकिर्दीतला आठवा सामना खेळणाऱ्या मयांकचे हे तिसरे शतक आहे. या शतकाच्या बळावर भारताने कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी २०० धावांचा टप्पा ओलांडला.
इंदौरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर भारत-बांग्लादेशमध्ये पहिला कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या डावात बांगलादेशच्या संघाने अवघ्या १५० धावांची खेळी केली. त्याला प्रत्युत्तर देत भारताने आतापर्यंत सव्वा दोनशेचा टप्पा ओलांडला आहे. त्यात मयांकच्या शतकाचा मोठा वाटा आहे. सलामीला आलेल्या मयांकचा स्लिपमध्ये उडालेला झेल इम्रूलने सोडला. या संधीचा फायदा घेत मयांकने बहारदार खेळ करत आणि १८३ धावांत शतक पूर्ण केलं. त्यात १५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.
डिसेंबर २०१८ मध्ये मयांकने ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात त्याने ७६ व ४२ धावांची खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा सामना भारताने १३७ धावांनी जिंकला होता. आठ सामन्यांतील १२ डावांत मिळून त्याने ६० पेक्षाही अधिक सरासरीसह ७००च्या वर धावा केल्या आहेत. त्यात सहा अर्धशतकांचा समावेश आहे. आजच्या शतकामुळे कमीत कमी डावांत तीन शतके ठोकणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी रोहित शर्मा, सुनील गावसकर, लोकेश राहुल यांनी ही कामगिरी केली आहे.