नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला तीन आठवडे उलटून गेल्यानंतरही सत्तासमीकरण जुळण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने आता राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या वैचारीक मतभेद असलेल्या पक्षांशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या नव्या मिलनात सत्तापेच अधिकच गुंतागुंतीचा होत असल्याचे चित्र सध्या राज्यात आहे, त्यामुळे नवे सरकार स्थापन होण्यासाठी आणखी काहीकाळ वाट पाहावी लागणार असल्याचे चिन्ह सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तूळात आहे.
सत्तास्थापनेसाठी कॉंग्रेस फारशी अनुकूल नसल्याचे चित्र सध्या दिल्लीत आहे. सत्तास्थापनेसाठी अशी आघाडी नव्याने होत असल्याने हा विलंब होत असल्याचे महाशिवआघाडीतील नेत्यांचे म्हणणे आहे. आता एका मुद्द्यावरून राष्ट्रवादीशीही मदभेत झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीनेही शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाबाबत समसमान फॉर्म्यूल्याची मागणी केली आहे. मात्र पाच वर्षे मुख्यमंत्री आमचाच हवा, अशी मागणी शिवसेनेची आहे.
मंत्रिपदाबाबत शिवसेनेने १६- १४- १२च्या फॉर्म्युला मांडला आहे. तर तीनही पक्षांना समान म्हणजेच १४-१४-१४, अशा फॉर्म्युल्यासाठी काँग्रेस आग्रही असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सत्तावाटपाचा तिढा सुटण्यासाठी अद्याप अवकाश आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा भाजपचेच सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे भाजपही या स्पर्धेतून अद्याप बाहेर गेलेला नाही. राज्यात भाजपशिवाय सरकार स्थापन होणार नाही, असे फडणवीस यांनी सांगत महाशिवआघाडीतील हवा काढून घेण्याचा प्रयत्नही भाजपकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनीही सरकार स्थापनेबद्दल स्पष्टता दिली नाही. या संदर्भात बोलणी सुरू असल्याचेही ते म्हणाले. राज्यात कधी सरकार बनेल याबद्दल आम्ही सांगू शकत नाही, असेही ते म्हणाले. १७ नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे याच दिवशी तिढा सुटेल का याकडे आता साऱ्यांचे लक्ष आहे.