मुंबई : ओला दुष्काळामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात मदत मिळावी या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यपालांची भेट घेतली. शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी फडणवीस यांनी यावेळी केली. तसेच गोरगरीब रुग्णांना दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून केली जाणारी मदत निधीचे संचलन आता राज्यपालांच्या कार्यालयातर्फे करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही तत्काळ कार्यवाहीचे आश्वासन यावेळी दिले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालय आणि त्यासंदर्भात मदत करणारी समिती बरखास्त करण्यात आली होती, त्यामुळे राज्यभरातून मदतीच्या आशेने येणाऱ्या रुग्णांची हेळसांड गेले काही दिवस होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यपालांची भेट घेतली.