नवी दिल्ली : राफेल प्रकरणात कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणाऱ्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. तसेच राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणात मागितलेली माफीही न्यायालयाने मान्य केली आहे. त्यामुळे मोदी सरकारवर गंभीर आरोप करणाऱ्या विरोधी पक्षांना दणका बसला आहे.
राहुल गांधी यांनी अमेठीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत मोदींविरोधात वक्तव्य केले होते. या प्रकरणी न्यायालयाने खेदही व्यक्त केला. राफेल प्रकरणी सुनावणी झाल्यानंतर 'चौकीदार चोर है', हे शब्द न्यायालयाच्या तोंडी घालून अवमान केल्याप्रकरणी न्यायालयाने माफी मागण्यास सांगितले होती. न्यायालयाने आज ती माफी मान्य केली आहे. सोबतच न्यायालयाने राफेल प्रकरणी दाखल केलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत.
राफेल प्रकरणाची चौकशी करण्याची गरज नसल्याचे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. यासह १४ लढाऊ विमानांच्या खरेदीप्रकरणी चौकशी करणाऱ्या याचिका फेटाळत यापूर्वीचा १४ डिसेंबर २०१८ रोजीचा निर्णय कायम ठेवला. या प्रकरणी आलेल्या निर्णयांच्या पूर्नविचार करण्यासाठी अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. १० मे २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने या याचिकांवरील निर्णयांवर आपला निकाल राखू ठेवला होता.
फ्रान्ससोबत ३६ राफेल लढाऊ विमानांचा करार केल्यानंतर याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर गुरुवारी सुनावणी झाली. या प्रकरणी माजी मंत्री अरुण शौरी, यशवंद सिन्हा, सर्वोच्च न्यायालयाचे वकील प्रशांत भूषण, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आदींनी याचिका दाखल केल्या होत्या.