‘जगातील कामगारांनो एक व्हा’ म्हणणार्या साम्यवाद्यांचीही अनेक शकले झाली. कामगारहितामध्ये तेसुद्धा एकत्र काम करू शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर १९५५ साली शून्यातून स्थापन झालेला १९८४ साली देशात दुसर्या क्रमांकावर आणि १९९४ पासून प्रथम क्रमांकावर असलेला ‘भारतीय मजदूर संघ’ आजही वर्धिष्णू आहे. ६५ वर्षांच्या काळात विभाजनाचा प्रश्न कधीही उद्भवलाच नाही. त्याचे कारण दत्तोपंत ठेंगडीजींनी घातलेला भक्कम पाया व मार्गदर्शन.
भारतामध्ये कामगार चळवळीची सुरुवात औद्योगिकरणानंतर १८८५ साली झाली. कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांनी टेक्सटाईल उद्योगात आंदोलन उभे केले. त्यानंतर पोस्ट, पोर्ट अॅण्ड डॉक, रेल्वे, केंद्र सरकार, कोळसा व खाण आदी उद्योगात कामगार संघटना उभ्या राहिल्या. १९२० साली ‘आयटक’ ही पहिली केंद्रीय कामगार संघटना काँग्रेस नेते लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. प्रारंभी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी उभ्या राहिलेल्या या संघटना राजकीय परिवर्तनाचे साधन म्हणून वापरल्या गेल्या.
प्रथम महायुद्धानंतर रशियाच्या साम्यवादी विचारांनी प्रेरित होऊन भारतातही साम्यवादी कामगार क्रांती घडविण्याच्या उद्देशाने कम्युनिस्टांनी १९२१ पासून कामगार चळवळीस सुरुवात केली. नव्याने संघटना उभ्या करण्याऐवजी कार्यरत असणार्या संघटना ताब्यात घेण्याची रणनीती ठरवून हळूहळू सर्वच उद्योगातील कामगार संघटना ताब्यात घेतल्या. सुरुवातीपासूनच त्यांचे विचार, आचार, आदर्श हे रशियातील लेनिन, स्टॅलिन व चीनमधील माओ हे आदी साम्यवादी नेते राहिलेले आहे.
कामगार असमाधानी, असंतुष्ट असल्याशिवाय पेटून उठणार नाहीत आणि क्रांतीसाठी सिद्ध होणार नाही, हा साम्यवादाचा मूलभूत सिद्धांत असल्यामुळे कामगारांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा कामगार असमाधानी कसा राहील, याकडेच त्यांचा कल राहिला. १९४७ मध्ये ज्येष्ठ काँग्रेस नेते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रेरणेने ‘इंटक’ची स्थापना झाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीपासूनच ‘इंटक’ने काँग्रेसचे अंग म्हणून कामास सुरुवात केली. काँग्रेस पक्षाची ध्येय-धोरणे राबविण्याचे काम त्यांनी केले. सुरुवातीपासूनच सर्व स्तरांवर मान्यताप्राप्त संघटना म्हणूनही दर्जा मिळूनही कामगार क्षेत्राबाबत स्वत:चा स्पष्ट विचार नसल्यामुळे सर्व प्रकारच्या अनुकूलता मिळूनही कामगार चळवळीत ठोस भूमिका ‘इंटक’ घेऊ शकली नाही. काँग्रेसचे धोरण सुरुवातीपासूनच रशिया प्रेरित समाजवाद असल्याने भारतीयत्व व भारतीय संस्कृती याचा समावेश ‘इंटक’मध्ये कधीही आला नाही.
त्याचप्रमाणे ‘इंटक’ व कम्युनिस्ट यांच्यातूनच फुटून ‘हिंद मजदूर सभा’, ‘हिंद मजदूर पंचायत’, ‘सीटू’, ’नॅशनल फेडरेशन ऑफ लेबर’, ‘सर्व श्रमिक संघ’, ‘युटीयुसी’ आदी केंद्रीय कामगार संघटना स्थापन झालेल्या असल्याने त्यांचीही कार्यपद्धती ‘इंटक’ व ‘आयटक’ यांच्याप्रमाणेच राहिलेली आहे. या संघटनांमध्ये १९५० ते १९५५ या काळात दत्तोपंत ठेंगडी यांनी ‘इंटक’ व साम्यवाद्यांच्या विविध संघटनांमध्ये प्रत्यक्ष काम केले. साम्यवादी व ‘इंटक’ या दोन्ही संघटनांच्या कामाचा व कार्यपद्धतीचा अभ्यास केला आणि १९५५ साली दत्तोपंत ठेंगडी यांनी ‘भारतीय मजूदर संघा’ची स्थापना केली.
राष्ट्रहित, उद्योगहित, कामगारहित ही अग्रक्रमाची त्रिसुत्री भा. म. संघाने प्रारंभापासूनच निश्चित केली. ‘देश के हित मे करेंगे काम - काम का लेंगे पुरा दाम’, ‘देशभक्त मजदूरो एक हो, राष्ट्रभक्त मजदूरो एक एक हो’ अशा घोषणांमधून कामगारांना राष्ट्रभावनेशी जोडले. ‘प्रथम राष्ट्र’ या भावनेशी कामगारांना जोडले. प्रत्येक कामगार जसा प्रथम कामगार आहे, संघटनेचा घटक आहे, तसाच तो राष्ट्राचेही महत्त्वाचे अंग आहे ही भावना रुजवली. कामगारांनी केवळ रोजीरोटी, आर्थिक बाबींचा विचार न करता आपण राष्ट्रपुनर्निर्माणाच्या कामातील महत्त्वाचे घटक आहोत हा विचार त्यांनी दिला. आपण कामगार म्हणून करीत असलेले कुठलेही काम हे देशाच्या हितासाठीच आहे ते श्रद्धेने आराधना म्हणून करा. त्यातून कामाचे समाधान मिळेलच, असा विचार देऊन कामाला व कामगारांना सन्मान मिळवून देण्याचे काम केले.
‘ट्रेड युनियन’ म्हणजे ‘नकारात्मकता’ हा रुढ झालेला समज दूर करून ’देश के हित मे करेंगे काम, काम का लेंगे पुरा दाम’ अशा घोषणांमधून कामगार चळवळीला सकारात्मक करण्याचे काम केले. ’भारत माता की जय’, ’वंदे मातरम’ या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या घोषणा होत्या. या घोषणा भारतीय मजदूर संघाने कामगार चळवळीत पहिल्यांदा सुरू केल्या. त्यावर कामगार चळवळीत या घोषणेचा संबंध काय? असा प्रश्न साम्यवादी व समाजवादी यांनी विचारला. त्याच्या मते कामगार चळवळ म्हणजे बोनस, महागाई भत्ता, वेतन वाढ हेच.
१ मे हा ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ आहे. तसेच जगातील अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया यासह अनेक देशांचा स्वत:चा ‘कामगार दिन’ निश्चित आहे. मात्र, भारताचा स्वत:चा कुठलाही कामगार दिवस नाही. भारतातील कामगार वर्षानुवर्षे विश्वकर्माला आपला पूर्वज मानतात, पूजा करतात. त्याने जगाची निर्मिती केली अशी धारणा आहे. त्यामुळेच ‘भारतीय मजदूर संघा’ने प्रथमच ‘विश्वकर्मा जयंती’ हा दिवस ’भारतीय श्रमिक दिवस’ म्हणून साजरा करण्याची मागणी केली आणि तसा तो साजरा करण्यास सुरुवात केली. कामगार आणि मालक सामूहिक सौदेबाजी करत असताना आणि आपापले अधिकार सुरक्षित मिळवत असताना या अधिकारांमुळे समाजाचा अन्य घटक असलेल्या ग्राहकावर त्याचा प्रतिकूल परिणाम होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, अशी भूमिका मांडली. वेतन मंडळांमध्ये कामगार आणि मालकांबरोबरच ग्राहकांचाही प्रतिनिधी असला पाहिजे, अशी मागणी करणारी भा. म. संघ ही एकमेव संघटना आहे.
‘भारतीय मजदूर संघा’ने देशात उत्पादन नीती, आयनीती, मूल्यनीती, वेतननीती असली पाहिजे आणि त्यात वेळोवेळी आवश्यक बदल केले पाहिजे, असा आग्रह धरला आणि त्यासाठी आजही भा. म. संघ आग्रही आहे. संघटनेमध्ये पारिवारीक भावना निर्माण केली, त्यामुळे विविध उद्योगात, विविध स्तरांवर आणि पदांवर काम करणारे सर्व कामगार पारिवारीक भावनेमुळे व समान उद्देशामुळे एकत्रित राहून काम करू लागले. यासाठी दत्तोपंतांचे विचार मार्गदर्शक ठरले.
‘कामगार संघटना या राजनीतीपासून दूर असल्या पाहिजेत. मात्र, राष्ट्रनीतीपासून नाही’ ही भूमिका मांडली व तसा व्यवहारही केला. राष्ट्राची अखंडता, संप्रभूता, लोकशाही यावर संकट आल्यास राष्ट्रवादी संघटना म्हणून आपली स्वतंत्र व ठोस भूमिका असली पाहिजे, हे त्यांनी कामगारांना पटवून दिले आणि तशा प्रकारची संकटे आल्यानंतर सक्रियपणे काम केले.
१९७५ मध्ये देशावर आणीबाणी लादली गेली. कामगारांचे भाषण स्वातंत्र्य, संघटना स्वातंत्र्य हिरावून घेतले गेले. कामगारांचा बोनस बंद करण्यात आला. त्याबाबत संयुक्त निवेदन देण्याचा निर्णय सर्व कामगार संघटनांनी घेतला मात्र त्यावर सही करायलादेखील कामगार संघटना तयार झाल्या नाहीत. मी मी म्हणणार्या लढावू साम्यवादी कामगार संघटना निष्क्रीय ठरल्या असताना भा. म. संघाने रस्त्यावर उतरून आणीबाणीच्या विरोधात लढण्याचे आव्हान स्वीकारले. लोकशाही वाचविण्यासाठी आणीबाणीच्या विरोधात सत्याग्रह करत भा. म. संघाचे हजारो कार्यकर्ते राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत ६ ते १७ महिन्यांसाठी तुरुंगामध्ये गेले. जयप्रकाश नारायण, रवींद्र वर्मा, नानाजी देशमुख आदी नेते सत्याग्रहात तुरुंगामध्ये गेल्यानंतर श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडीजी यांनी लोकसंघर्ष समितीचे सचिव म्हणून काम पाहिले आणि भूमिगत राहून दोन वर्षे सरकारच्या विरोधात संघर्ष करून जनजागरण केले.
जागतिकीकरण सुरु झाल्यानंतर जगात ‘गॅट अॅग्रीमेंट’ झाले. त्याचे रुपांतर नंतर जागतिक व्यापार संघटनेत झाले. या ‘डब्ल्यूटीओ’मध्ये शेतकरी व कामगार आणि देशहितविरोधी अनेक तरतुदी होत्या. त्यावर देशभर जनजागरण करण्याचे काम ‘भारतीय मजदूर संघा’ने केले. त्यासाठी दत्तोपंतांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. जागतिकीकरणाला विरोध करताना स्वदेशीचा पर्याय त्यांनी ठेवला आणि ‘स्वदेशी जागरण मंच’ स्थापन करून स्वदेशीचे महत्त्व पटवून देण्याचे काम त्यांच्या सैद्धांतिक विचारातून करून दिले. जगामध्ये जागतिक व्यापार संघटना स्थापन झाली.
‘भारतीय मजदूर संघा’चे विचार व प्रत्यक्ष व्यवहार यामुळे कामगारांमध्ये मजदूर संघाची मान्यता वाढली. ’देश के हित मे करेंगे काम, काम का लेंगे पूरा दाम’ या घोषणेद्वारे कामगारांमध्ये आपण करीत असलेले काम हे राष्ट्रहितासाठी करीत आहोत, ही भावना निर्माण केली आणि कामगारांच्या जीवनाला उद्देश मिळवून देण्याचे काम दत्तोपंत ठेंगडी यांनी केले. अशाप्रकारे भारतीय कामगार चळवळीला भारतीयत्व व राष्ट्रवादाशी जोडण्याचे कार्य दत्तोपंत ठेंगडी यांनी केले.
लेनिनने त्याच्या ’लेफ्ट इन कम्युनिझम’ या ग्रंथात म्हटले आहे की, स्कूल ऑफ कम्युनिझमच्या नात्याने कामगार युनियनमध्ये घुसा, त्यानंतर युनियनमध्ये जे कम्युनिस्ट नाही त्यांच्याविरोधात खोटा प्रचार करा, त्यांना बदनाम करा आणि सदरच्या युनियन ताब्यात घेऊन रक्तकांतीसाठी सज्ज करा. या शिकवणीमुळे राष्ट्रहिताशी संबंधित कोणताही विषय आल्यावर साम्यवाद्यांनी ’जगातील कामगारांनो एक व्हा’ अशी घोषणा देऊन कामगारांमध्ये फूट पाडली. मात्र, भारतामध्ये सर्व अनुकूलता व संसाधने असूनही त्यांना यश आले नाही. त्याचे महत्त्वाचे एक कारण राष्ट्रवादावर आधारित दत्तोपंत ठेंगडीजींनी निर्माण केलेला ‘भारतीय मजदूर संघ’ हे आहे.
‘जगातील कामगारांनो एक व्हा’ म्हणणारे साम्यवाद्यांचीही अनेक शकले झाली. कामगारहितामध्ये तेसुद्धा एकत्र काम करू शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर १९५५ साली शून्यातून स्थापन झालेला १९८४ साली देशात दुसर्या क्रमांकावर आणि १९९४ पासून प्रथम क्रमांकावर असलेला ‘भारतीय मजदूर संघ’ आजही वर्धिष्णू आहे. ६५ वर्षांच्या काळात विभाजनाचा प्रश्न कधीही उद्भवलाच नाही. त्याचे कारण दत्तोपंत ठेंगडीजींनी घातलेला भक्कम पाया व मार्गदर्शन.१० नोव्हेंबर, २०१९ ते १० नोव्हेंबर, २०२० हे दत्तोपंत ठेंगडी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांनी आपल्या ५५ वर्षांचा काळ कामगार चळवळीत काम केले. त्यांचे विचार आजही कामगार चळवळीला प्रेरक व मार्गदर्शक आहेत.
-अॅड. अनिल दुमणे
(लेखक भारतीय मजदूर संघ, मुंबईचे सचिव (कोकण विभाग संघटक) आहेत.)