बुधवारी सकाळी संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना ‘राज्यपालांनी सर्व पक्षांवर अन्याय केलाय’ अशी प्रतिक्रिया दिली. शिवाय पत्रांचा गोंधळ झाला असला तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असा ठाम विश्वासही व्यक्त केला. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात व माणिकराव ठाकरे लीलावती रुग्णालयात जाऊन संजय राऊत यांची भेट घेतली.
शिवसेनेच्या वतीने मजबुतीने किल्ला लढवल्याबद्दल काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी संजय राऊत यांचे कौतुक केले. रुग्णालयातून संजय राऊतांनी थेट हॉटेल ट्रायडंट गाठले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये हॉटेल ट्रायडंटमध्ये चर्चा सुरू असून, चर्चा योग्य दिशेने सुरू झालीय; निर्णय योग्य वेळी सर्वांना कळेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. दरम्यान, कॉंग्रेसने हिंदूत्व, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भातील मुद्दे बाजूला ठेवण्याची अट घातल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांनीही या पर्यायाला संमती दिल्याचे कळते. त्यामुळे हिंदूत्वाच्या मुद्द्यावर एकेकाळी रान उठवणारी शिवसेना आता 'सेक्युलर' पक्षांसह तडजोड करत असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहे.