'मदतीचा एक हात' ने हजारो उपेक्षितांच्या जीवनाला नवी झळाळी

    13-Nov-2019
Total Views | 200


 


सुरुवातीला कदम हे आपल्या कमाईतील काही ठराविक हिस्सा या मदतकार्यावर खर्च करू लागले, परंतु एका हाताची मदत कमी पडू लागल्याने त्यांनी आपल्या जवळच्या काही मित्रांना या कामासाठी आवाहन केले आणि हळूहळू मदतकार्याला बरेच हात पुढे आले.


उल्हासनगर : आपले समाजाविषयी काही देणे लागते, या उदात्त व शुद्ध भावनेने समाजातील उपेक्षित घटक, वनवासी यांना यथाशक्ती मदत करण्याची मनात खूणगाठ बांधून चार वर्षांपूर्वी उल्हासनगरातील विजय कदम या तरुणाने 'एक हात मदतीचा' ही सामाजिक संस्था स्थापन केली. गेल्या चार वर्षांत संस्थेने बारा तालुक्यांतील वनवासी पाड्यांना मदत, ३४ जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, तसेच अन्य अशा प्रकारचे उपक्रम राबवत गरजूंना मदतीचा हात दिला आहे. विजय कदम हे महानगरपालिकेचे कंत्राटदार असून एकदा धकाधकीच्या जीवनातून थोडी उसंत मिळावी, यासाठी मित्रपरिवारांसोबत भंडारदरा येथे फिरायला गेले होते. रम्य निसर्गाबरोबरच त्यांना वनवासी पाड्यातील विदारक दृश्ये पाहायला मिळाली. त्यांचे अठराविश्व दारिद्य्र, वीज-पाणी-आरोग्य यांचा अभाव, कुडाची घरे, काही घरांवर फक्त आभाळाचेच छत. ही माणसे जगतात तरी कशी, असा सवाल त्यांच्या मनात निर्माण झाला. त्यांनी हे दुसरे जग पहिल्यांदाच पाहिले. आपण यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे, असा निश्चय त्यांनी केला आणि 'एक हात मदतीचा' या सामाजिक संस्थेचा जन्म झाला.

 

या सामाजिक संस्थेने महाराष्ट्रातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड, डहाणू, वाडा, शहापूर, मुरबाड, उल्हासनगर, कर्जत, जुन्नर, कल्याण, त्र्यंबकेश्वर, खालापूर, महाड, अकोले, रोहा, तळा आदी तालुक्यांतील दुर्गम भागातील वाडी-वस्त्यांमधील लोकांना मदतस्वरूप धान्ये, कपडे, ब्लँकेट आर्थिक मदत, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, दप्तर, वह्या, कंपासपेटी, छत्री तसेच इतरही अनेक उपक्रम घेण्यात आले. आतापर्यंत १२ तालुक्यांतील वाड्या-वस्तांना धान्ये, कपडे तसेच तालुक्यांतील ३४ जिल्हा परिषद शाळांतील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच आगीत जळून गेलेल्या घरातील कुटुंबाला, सर्पदंशाने मृत्यू पावलेल्या मुलांच्या कुटुंबाला तसेच मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत असे वेगवेगळे मदतीचे उपक्रम संस्थेच्या वतीने घेण्यात आले.

 

सुरुवातीला कदम हे आपल्या कमाईतील काही ठराविक हिस्सा या मदतकार्यावर खर्च करू लागले. परंतु, एका हाताची मदत कमी पडू लागल्याने त्यांनी आपल्या जवळच्या काही मित्रांना या कामासाठी आवाहन केले आणि हळूहळू मदतकार्याला बरेच हात पुढे आले. त्यामुळे संस्थेची मदतकार्याची गती वाढली. वनवासी दुर्गम भागातील काही स्वयंसेवकही 'एक हात मदतीचा' या संस्थेशी जोडले गेल्याने ज्यांना मदतीची गरज आहे, अशा लोकांची माहिती संस्थेला मिळते व गरजू व्यक्तीला मदत पुरविली जाते. "स्वतःसाठी सर्वच जगतात, पण स्वतःसाठी व इतरांसाठी जगणे यात वेगळाच आनंद आहे व आत्मिक समाधान आहे. संस्थेच्या माध्यमातून एखाद्याच्या जीवनात थोडासा आनंद निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या कार्यास माझ्या सहकाऱ्यांचेसुद्धा मोठे योगदान आहे. मदतकार्याचा उपक्रम भविष्यात अविरतपणे सुरू ठेवणार आहे," असे विजय कदम यांनी 'दै. मुंबई तरुण भारत'शी बोलताना सांगितले.

 

- शिवाजी वाघ

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121