‘से नो टू प्लास्टिक’ : नमिता तायल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |




सायकलवरून रोज सकाळी 15 किलोमीटर प्रवास करत सार्वजनिक ठिकाणी कापडी पिशव्या देत ‘से नो टू प्लास्टिक’चा नारा देणार्‍या हरियाणातील नमिता तायल यांच्याविषयी...


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून प्लास्टिकमुक्त भारताचा नारा देत प्लास्टिकमुळे होत असलेल्या प्रदूषणावर नियंत्रण यावे
, याकरिता एक मोठे पाऊल उचलले. ‘सिंगल युज प्लास्टिक’ हा दररोजच्या वापरात येणारा घटक आहे. जसे की, बाजारात सर्रास मिळणार्‍या प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या यांसारख्या वस्तू. सिंगल युज प्लास्टिकवरील निर्बंध आणण्याच्या केंद्र सरकारच्या मोहिमेचा परिणाम देशभर दिसून येत आहे. तरी आजही घरगुती उपयोगात प्लास्टिकचा वापर होताना दिसतो.


‘सिंगल युज प्लास्टिक’ला पर्याय देत जनजागृती करणार्‍या हरियाणातील नमिता तायल यांनी इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. ‘एनआयएफटी’मधून इंटिरिअर डिझाईनमध्ये पदविका संपादन केली. लग्नानंतर त्या पलवल येथील बुलंदशहरमध्ये आल्या. हरियाणातील ‘मानव सेवा समिती’, ‘जीवनदायिनी’ या सामाजिक संस्थांसोबत काम केल्यानंतर त्यांनी आपल्या काही सहकार्‍यांसह २०१७ मध्ये ‘क्लीन अ‍ॅण्ड स्मार्ट पलवल असोसिएशन’ची स्थापना केली. तेव्हापासूनच त्या रक्तदान, नेत्रदान, गरजूंसाठी वैद्यकीय शिबिरे, शासकीय शाळा, मुलांना मदत करणे, रक्त कर्करोगग्रस्तांना आर्थिक मदत करणे, महिलांचा विनयभंग होण्यापासून बचाव करण्यासाठी मदत करणे यांसारख्या गोष्टी त्यांच्या नियमित दिनक्रमाचा एक भाग आहेत.


नमिताने रक्तदान केले आहे आणि आपल्या शरीरातील सात अवयव दान करण्याचे वचन दिले आहे
. यासोबतच त्या मजूर कुटुंबातील मुलांनाही शिक्षणासाठी आर्थिक मदत करत आहे. गेल्या १५ वर्षांपासून त्या सामाजिक सुधारणांकरिता काम करीत आहेत. सध्या त्या ‘क्लीन अ‍ॅण्ड स्मार्ट पलवल असोसिएशन’च्या अध्यक्षा आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही संस्था शहरातील सामाजिक व पर्यावरण संरक्षणविषयक जनजागृती करण्याचे काम करते.सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नमिता गेल्या तीन वर्षांपासून स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण या विषयावर काम करत आहेत. आपल्या कार्याविषयी सांगताना त्या म्हणतात, “मी तीन वर्षांपूर्वी माझ्या वाढदिवसाला एक निश्चय केला तो म्हणजे यापुढे मी समाजकार्यासाठी स्वतःला झोकून देईल. तसेच समाजात जनजागृती करण्यासाठी काम करेन,” हे सांगताना त्यांचा उत्साह तरुणाईलाही लाजवणारा होता.


त्यांच्या संस्थेचे कार्य हे प्रमुख तीन उद्देश समोर ठेवून चालते ते म्हणजे
:

- पॉलिथीन मुक्त पलवल.

- घरोघरी कचरा गोळा करा.

- शहरात कचरा व्यवस्थापन प्रकल्प असावा. जेथे सुका कचरा वेगळा आणि ओल्या कचर्‍यांपासून खतरुपी पुनर्वापर करता येईल. ही तीन उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी नमिता आणि तिचे सहकारी प्रयत्न करीत आहेत. सुरुवातीला ते सर्व दर रविवारी शहरातील सर्व कॉलनींमध्ये जाऊन कचरा गोळा करत व तेथील लोकांना कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूक करत. स्वच्छतेसोबतच प्लास्टिक बॅगचा वापर टाळत कापडी पिशव्या देत त्या प्लास्टिक न वापरण्याबाबत जनजागृती करत आहेत.






यासाठी त्यांच्या संघटनेने
कापड व्यापार संघटनेसोबत हातमिळवणी करत त्यांना आपल्या या अभियानाशी जोडले. पूर्वी ही संघटना आपल्याकडील जुने कपडे विकत असे, पण आता नमिताच्या सांगण्यावरून ते आपल्याकडील जुने कपडे नमिता यांच्या संस्थेला देतात. संस्थेने या कपड्यांमधून कापडी पिशव्या तयार केल्या असून हे काम गरीब व गरजू मुलींना देण्यात आले आहे. यामुळे ५० महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या कपड्यांच्या पिशव्या त्यांनी शहरातील मोठ्या दुकानांना दिल्या आहेत आणि आपल्या ग्राहकांना यात वस्तू देण्याची विनंती केली आहे. सर्व ग्राहकांनी आपल्या घरातून निघतानाच कपड्यांच्या पिशव्या घ्याव्या जेणेकरून त्यांना कुठेही पॉलिथीन मागावी लागू नये. या उपक्रमात पलवलमधील छोट्या दुकानदारांपासून ते डॉक्टरांपर्यंत सर्वच आपल्याला पाठिंबा देत असल्याचे नमिता सांगते.

 


याव्यतिरिक्त त्यांनी शाळा
, महाविद्यालये, मंदिरे आणि गुरुद्वारा अशा सार्वजनिक ठिकणी जाऊन या कापडी पिशव्या भेट देत याच्या वापराचे महत्त्व पटवून देत आहेत. आतापर्यंत त्यांनी ३५ शाळांना भेटी दिल्या आहेत आणि स्वच्छता मोहिमेचे महत्त्व आणि पॉलिथीनमुक्त शहरावर चर्चासत्रे आयोजित केली आहेत. या सर्व सामाजिक कार्यासोबतच नमिता आपल्या फिटनेस आणि आरोग्याबाबतही जागरुक आहेत. नमिता रोज सकाळी सायकल घेऊन घराबाहेर पडतात व सार्वजनिक ठिकाणी लोकांना वातावरणाविषयी जागरूक करतात. अशाप्रकारे रोज त्या तब्बल १५ किमींपर्यंतच्या परिसरात जनजागृती करतात. यावेळी त्या ‘सिंगल युज प्लास्टिक’ न वापरण्याविषयी लोकांशी बोलतात. तसेच, निरोगी जीवनशैली अवलंबण्यास प्रवृत्त करतात.



याशिवाय नमिता यांच्या अध्यक्षतेखालील शहरातील शासकीय रुग्णालयात ६०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले व रोपांची त्याच्या संस्थेकडून काळजीही घेतली जाते
. पलवल येथील रेल्वेस्थानक स्वच्छ व सुशोभित करण्यात आले आहे. नमिता आपल्या घरी स्वत: ओल्या कचर्‍यापासून कम्पोस्ट खत बनवतात. या खताच्या वापरातून त्यांनी घरात एक बाग फुलवली आहे. तसेच त्यांच्या घरात पॉलिथीन अजिबात वापरले जात नाही. त्यांनी रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी हार्वेस्टिंग सिस्टीम बसविली आहे. याव्यतिरिक्त ‘आरओ’मधून बाहेर पडणारे पाणी वाचवून घरगुती कामासाठी त्याचा पुनर्वापर करतात. सध्या १५० महिला आणि ५० पुरुष ‘क्लीन अ‍ॅण्ड स्मार्ट पलवल असोसिएशन’ला जोडलेले आहेत.



नमिता तायल म्हणतात की
, “दुर्गामाता हे आमचे प्रेरणास्थान आहे. पुरुषांचा आदर करताना स्त्रियांनी स्वत:चे जीवन स्वतंत्रपणे जगायला हवे. त्यांनी आत्मनिर्भर व्हावे. प्रगतीच्या मार्गावर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे. जर महिला सशक्त असतील तर राष्ट्रही बळकट होईल. त्यांना त्यांचे हक्क माहीत असले पाहिजेत. महिलांना शिक्षित केले पाहिजे आणि समाजासाठी वेळ काढला पाहिजे.”



- गायत्री श्रीगोंदेकर 
@@AUTHORINFO_V1@@