नवी दिल्ली : टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी व्होडाफोन भारतातून आपला गाशा गुंडाळणार असल्याची निव्वळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे. ब्रिटनस्थित दूरसंचार कंपनी व्होडाफोन भारतीय बाजारातपेठेतील आपली गुंतवणूक कायम ठेवणार असून सद्यस्थितीतील आव्हानांत तग धरून राहण्यासाठी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करणार आहे.
व्होडाफोन समुहाने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, "भारतीय प्रसिद्धीमाध्यमांनी भारतातील आर्थिक मंदीचे कारण पुढे करत व्होडाफोन कंपनी भारतातून बंद होणार असल्याची अफवा उठवली आहे. हे आमच्यासाठी दूर्भाग्यपूर्ण आहे. व्होडाफोन भारतातून बंद होणार या निव्वळ अफवा आहेत. व्होडाफोन समुह सक्रीय आहे आणि बाजारातील स्पर्धेत तग धरू पाहत आहे. या स्पर्धेत आपले स्थान अबाधित राखण्यासाठी सरकारकडे मदत मागत आहे.
गेल्या काहीकाळापासून व्होडाफोन आर्थिक संकटात आहे. कंपनीवर प्रचंड कर्ज असल्याने कंपनी बंद होऊ, शकते, अशी अफवा उठली होती. नुकतेच व्होडाफोन आणि आयडीया या कंपन्यांचे विलीनीकरण झाले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालानुसार, कंपनीला एडजेस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू (एजीआर) म्हणजे ४० हजार रुपये द्यावे लागणार आहेत. या निर्णयानंतर कंपनीचे समभाग सर्वात निम्न स्तरावर पोहोचले होते. २५ ऑक्टोबरनंतर शेअर बाजारात कंपनीने ही माहिती दिली होती. त्यामुळे व्होडाफोन बंद होईल, अशी शक्यता व्यक्त केली जाऊ लागली होती. मात्र, कंपनीने आता स्पष्टीकरण देत ही बाब नाकारली आहे.