भिवंडी : भाजपच्या ‘नवसंकल्प’ उपक्रमातून खा. कपिल पाटील यांनी शेलार गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच बलाढ्य महाराष्ट्रासाठी आगामी निवडणुकीत भाजपला मत देण्याचे आवाहन केले.
विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेले कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्याबरोबरच ‘नवा महाराष्ट्र’ घडविण्यासाठी नवसंकल्प उपक्रम राबविला जात आहे. युवकांना स्थायी रोजगार, दुष्काळमुक्ती, बळीराजाची समृद्धी, सर्वांना मिळेल सर्व अधिकारी, प्राथमिक आरोग्य-उपचार, सशक्त महिला, पारदर्शक आणि स्वच्छ कारभार आदी नऊ उपक्रमांची खा. कपिल पाटील यांनी नागरिकांना सविस्तर माहिती दिली. खा. कपिल पाटील यांच्या उपस्थितीत शेलार येथील नागरिकांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शांताराम भोईर, जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण भोईर, सरपंच, उपसरपंचांबरोबरच ग्रामपंचायतीचे सदस्य आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यामध्ये २०२४ पर्यंत प्रत्येक घराला पाणी, प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वत:चे पक्के घर, डिजिटल उपाययोजनांच्या माध्यमातून घरपोच सेवा, दुष्काळमुक्तीसाठी जलयुक्त शिवार आणि वॉटरग्रीडच्या निर्मितीची प्रक्रिया, युवकांना स्थायी रोजगार, महात्मा फुले जनारोग्य आणि ‘प्रधानमंत्री आयुष्मान भारत’ योजनेतून प्रत्येक घटकापर्यंत आरोग्यसेवा, दुर्गम भागात तंत्रज्ञानाच्या मदतीने सक्षम आरोग्य यंत्रणास महिलांच्या विकासाची चळवळ आणखी गतीने पुढे नेऊन महिलांच्या विकासात समान हक्क-वाटा आदींबाबत खा. कपिल पाटील यांनी नागरिकांना माहिती दिली.