मुंबई : आरेमध्ये सुरू असलेल्या मेट्रो कामादरम्यान करण्यात आलेल्या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी आलेल्या एकूण २९ आंदोलकांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर बोरीवली सत्र न्यायालयात सुनावणी झाली होती. ताब्यात घेतलेल्या ३८ जणांपैकी २९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या याचिकेवर रविवारी सुनावणी झाली. यावेळी सर्व २९ जणांना जामिन मंजूर करण्यात आला आहे.
आरे आरे कारशेडप्रकरणी पर्यावरणवाद्यांनी दाखल केलेल्या याचिका काल उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर आरेमध्ये वृक्षतोड सुरु करण्यात आली. त्यानंतर पर्यावरणवाद्यांनी आणि परिसरातील नागरिकांनी निदर्शने करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत या वृक्षतोडीला विरोध करत याभागात आंदोलनकर्त्यांची होत असलेली गर्दी पाहता सकाळी पोलिसांनी या परिसरात १४४ कलम लावून जमावबंदी केली आहे.