देशाचे माजी उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त आज मुंबई येथे राष्ट्रीय एकता दौडचे (रन फॉर युनिटी) आयोजन करण्यात आले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झेंडा दाखवून एकता दौडला रवाना केले. राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ दिली. महाराष्ट्र शासन व मुंबई महापालिकेच्या वतीने 'रन फॉर युनिटी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राहुल नार्वेकर, आमदार राहुल कुल, मुख्य सचिव अजोय मेहता, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे , कोकण विभागाचे आयुक्त शिवाजी दौंड, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी बन्सी गवळी, आदी उपस्थित होते.
एकता दौडमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय कॅडेट कोर, जलद कृती दल (क्यूआरटी), कमांडो, पोलीस पथके, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक यांचे कर्मचारी, विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्काऊट गाईडसह क्रीडा अधिकारी, प्रशिक्षक यांच्यासह बालकांपासून वृद्धांपर्यंत नागरिक सहभागी झाले होते.
एकता दौडची सुरुवात नरीमन पोइंट येथे तर समारोप मरीन ड्राईव्ह येथील ग्रँट मेडिकल कॉलेज जिमखाना येथे झाला.