रियाध : 'भारतीय अर्थव्यवस्था सुस्त जरी असेल तरीही येत्या तिमाहीत पुन्हा उभारी घेईल', असा विश्वास उद्योगपती मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला आहे. सौदी अरेबिया येथील 'फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटीव्ह'मध्ये उपस्थितांना संबोधित कराताना ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत २९ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर हा कार्यक्रम सुरू आहे. यात मुकेश अंबानी यांच्यासह भारतातील अनेक दिग्गजांचा सहभाग होता. भारतातील अर्थव्यवस्थेबद्द्ल त्यांना विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
अंबानी म्हणाले, "देशात आर्थिक मंदीचे वातावरण तात्पूरते असून सरकारने उचललेल्या सकारात्मक पावलांमुळे पुढील तिमाहीत बदल दिसेल. जग आता नव्या तंत्रज्ञानाच्या कक्षेत प्रवेश करत आहे. याचा थेट परिणाम जागतिक अर्थकारणावर होत आहे. याच कक्षेत नवी आव्हाने आणि नव्या संधीही दिसू लागतील. भारत ज्या प्रकारे जागतिक पटलावर आत्तापर्यंत उभा राहिला आहे. त्यादृष्टीने विचार करायचा झाल्यास पुढील वाटचाल सकारात्मकच असेल."